बळीराजा हा एक अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्याच राज्यात प्रामुख्याने शेतकरी वर्गाची भरभराट झाली. मात्र ब्राम्हण व देवांना शेतकऱ्यांची ही भरभराट व त्यांचा राजा असलेल्या बळीचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्यांनी कट करून बटू वामनाच्या मदतीने बळीराजाचा काटा काढला, अशी एक मांडणी अतिशय कल्पकतेने केली जाते आणि तिला मी-मी म्हणविणारे विद्वान सुद्धा बळी पडताना आपण बघतो.
मुळात हे सगळे तर्क प्रामुख्याने आर्य-द्रविड सिद्धांताची अपत्ये आहेत. आर्य या भारताच्या बाहेरून आलेल्या प्रगत जमातीने, तुलनेने मागास अशा द्रविड या मूलनिवासींचा पराभव केला. हे आर्य म्हणजेच देव किंवा ब्राम्हण वंशीयांचे पूर्वज. ज्यांनी शेतकरी, कष्टकरी म्हणजेच शूद्र समाजावर अत्याचार केले, असे भ्रामक आणि आधुनिक इतिहास अभ्यासकांनी साफ खोटे ठरवलेले सिद्धांत दडपून सांगितले जातात. मग हिंदू पुराणे, रामायण-महाभारतासारखे प्राचीन ग्रंथ, उपनिषदे यातील कथा-उपकथांतील सोयीस्कर भाग घेऊन अर्धवट मांडणी केली जाते. वामन, परशूराम आणि राम या ऐतिहासिक व्यक्तीमत्वांना अशा कारस्थानी वृत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे एकीकडे हिंदू पुराणे म्हणजे भाकडकथा असल्याचे ठासून सांगणारेच त्यातील कथांवर असे प्रश्नचिन्ह उभे करतात.
विष्णू हे हिंदूंच्या तीन मुख्य देवतांपैकी आणि कदाचित सर्वात लोकप्रिय दैवत असावे. या दैवताने सृष्टी कल्याणासाठी घेतलेले निरनिराळे अवतार हे दशावतार म्हणून ओळखले जातात. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताशी बऱ्यापैकी मिळतेजुळते असणारे हे अवतार हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहेत. त्यामुळे याच अवतारांना लक्ष्य करून समाजाचा बुद्धिभेद करण्याचे समाजकंटकांचे प्रयत्न असतात. दुर्दैवाने घट्ट जातीय उतरंडीमुळे हजारो वर्षे अन्याय झालेल्या दलित समाजात असे गैरसमज पसरविणे सोपे असते. दलित समाज किंवा मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याबद्दल कोणत्याही विवेकी व्यक्तीचे दुमत असू शकत नाही. मात्र त्यासाठी कथित सवर्ण समाजाविरोधात सातत्याने चिथावणी देणे सुद्धा हितावह नसते. त्यातून समाजात नेहमीच एक दरी राहते, किंबहुना अशी दरी निर्माण व्हावी किंवा वाढावी असे वाटणारेच अपसमजांना खतपाणी घालतात.
बळी हा बहुजनांचा राजा होता असे विधान सर्रास केले जाते. मुळात वर्णव्यवस्था ही कर्माधीष्ठीत होती. राजा हा राज्याचा पालक, शासक आणि संरक्षक या भूमिकेत असल्यामुळे तो कोणत्याही (अगदी रावणासारखा जन्माने ब्राम्हणवर्णाचा असला तरीही) वर्णाचा असला तरी त्याला क्षत्रिय समजले जाई. जर बहुजन म्हणजे शूद्र हेच अभिप्रेत असेल, तर क्षत्रिय वर्णाचा राजा हा बहुजन समाजाचा कसा ठरू शकतो? अर्थात मराठा चळवळ चालविणारे नेते बहुजनांची व्याख्या ब्राम्हणेतर समाज अशी करतात. पण तार्किकदृष्ट्या हे तरी खरे कसे मानायचे? मध्ययुगीन इतिहास नीट पाहिला तर ब्राम्हण समाजाइतकीच क्षत्रिय (मराठा) समाजानेही शूद्र समाजावरील (दलित समाज) अन्यायात भागीदारी नोंदविली आहे. मुळात अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे. तो पाळणारे सगळेच दोषी इतकी परखड मांडणी सोयीची नसल्यामुळे मग इतिहास अर्धवट सांगून सत्य दडपले जाते.
मग प्रश्न उरतो की बळी कोण होता? बळी हा विरोचनाचा पुत्र, सुप्रसिद्ध विष्णूभक्त प्रल्हादाचा नातू आणि हिरण्यकश्यपू या असुरसम्राटाचा पणतू होता. इतकेच नव्हे तर पुढे महाभारत काळात बळीराजाचा मुलगा बाणासुर देखील दिसतो. असूर हा शब्द मूळ संस्कृत आहे. सूर (देव) या शब्दाचा विरुद्ध अर्थ असूर असा नव्हे तर असूर म्हणजे वीर्यवान किंवा प्राणशक्ती असणारा होय. वेदांमध्ये काही ठिकाणी देवराज इंद्राला देखील ‘असूर’ म्हणून गौरविले आहे. गंमत म्हणजे देव, असुर, नाग आणि मानव हे सर्वच कश्यप ऋषींचे पुत्र होते. ब्रम्हदेवाने सृष्टीनिर्मिती केल्यानंतर त्यांचे मानसपुत्र मरीचि ऋषींपासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाने दक्ष या प्रजापतीच्या (गौरीचा पिता आणि शंकराचा सासरा) १७ मुलींशी विवाह केला. ज्यातील अदिती या पत्नीपासून आदित्य. इंद्र आणि आपल्या लेखातील वामन या विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. दिती पासून दैत्य, दनु पासून दानव, अनिष्ठापासून गंधर्व, सुरसापासून राक्षस, मुनिपासून अप्सरा, विनता पासून गरुड आणि अरुण (सूर्याचा सारथी), कद्रूपासून नाग, याशिवाय काष्ठा, इला, क्रोधवशा, सुरभि, सरमा, ताम्रा, तिमि, पतंगी, यामिनी या इतर पत्नी होत. उर्वरित समस्त जीवसृष्टी यांच्यापासून निर्माण झाली असे उल्लेख वेद, पुराणे आणि ब्राम्हण्ये यांमध्ये मिळतात.
थोडक्यात ही कथा सत्य मानली तर वरील सर्व वंश एकाच व्यक्तीपासून सुरू झाले असे मानावे लागेल आणि जर ही कथा मान्य नसेल तर मग त्यातील सोयीची व्युत्पत्ती घेऊन आपल्याला हवे ते कुतर्क देणे तरी थांबले पाहिजे. आता मूळ बळीराजाच्या कथेकडे वळू. बळीराजाचा वंशवृक्ष पाहिला तर त्याचे पणजोबा हिरण्यकश्यपू, आजोबा सुविख्यात विष्णूभक्त प्रल्हाद आणि वडील विरोचन हे होते. बळीराजाचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा सासरा होय. म्हणजे रामायणपूर्व काळ ते महाभारत युद्धोत्तर काळ एवढ्या प्रचंड दीर्घ कालावधीत बळीराजा किंवा त्याचा वंश डोकावतो. मग हा वंश कोणीतरी वेगळा, शोषित किंवा अन्यायग्रस्त होता असे कसे मानायचे?
आता थेट बळीराजाचे चरित्र पाहू. भारतीय इतिहासातील अत्यंत न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर, सत्यवचनी आणि पराक्रमी राजांमध्ये बळीची गणना होते. हिरण्यकश्यपू हा देखील अतिशय पराक्रमी सम्राट होता. तत्कालीन बहुतांश भारत देशावर त्याची सत्ता असली तरी तो अतिशय एककल्ली आणि संशयी होता. प्रल्हाद आख्यानातून त्याचा हा संशयीपणा विशेषत्वाने डोकावतो. एवढे असले तरी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना तिच्या सुरक्षेसाठी देवर्षी नारदाच्या आश्रमात हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून राहात होती. याचाच अर्थ देव आणि असुर यांच्यातील वैर हे वांशिक नव्हे तर सत्तानुषांगिक असावे. पुढे हिरण्यकश्यपूने आपलाच पुत्र प्रल्हाद याच्यावर अनेक अत्याचार केले. अखेर विष्णूने नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. यावेळी विष्णूने प्रल्हादाला वचन दिले की, यापुढे तुझ्या वंशातल्या कोणाचाही मी वध करणार नाही. विरोचनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र बळी आणि बाणासुर या दोघांनाही वामन आणि श्रीकृष्णाने विष्णूच्या वचनाचा मान राखून जिवंत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी नातेसंबंध जोडले.
शंभरावा यज्ञ करताना मात्र बळीचा उद्देश स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित करणे हा होता. साहजिकच त्यामुळे देवांच्या गोटात चिंता पसरली. याचाच अर्थ तोपर्यंत देव आणि असुर या दोन्ही राज्यांत निकराची लढाई करणे दोन्ही पक्षांनी टाळले होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर शक्ती संतुलन करून आपापले प्रभावक्षेत्र निर्माण करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश असावा. मात्र ९९ यज्ञ करून इतर असंख्य राजांना आपल्या कवेत घेणारा बळीराजा आता सामर्थ्यवान झाला होता आणि त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे देवांनी ब्रम्हदेव आणि पुढे विष्णूकडे धाव घेऊन हस्तक्षेपाची विनंती केली. विष्णूने आपल्या पूर्वीच्या वचनाचे स्मरण ठेवून आणि बळीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन या बटूरूपाने अवतार घेतला. नेमका हाच संदर्भ आपल्या सोयीने वापरला जातो. वामन हा ब्राम्हण होता असा कांगावा करून त्याने शेतकऱ्यांच्या राजाला मारले असे सांगतात. पण असुर काय किंवा देव काय सगळे याच कश्यपाचे वंशज होते. म्हणजे वामन हा यांच्या सोयीने नव्हे तर कर्माने ब्राम्हण होता. तसेच बळीराजा हा कर्माने क्षत्रिय होता. हे दोघेही एकाच वंशात जन्माला आले होते. इतकेच नव्हे तर बळीराजाचा यज्ञ करणारे असुर कुलगुरु श्री शुक्राचार्य आणि इतर ऋत्विज हे ब्राम्हण नव्हते काय? मग आपल्याला अर्धवट इतिहास का सांगितला जातो?
पुढे वामनाने बळीच्या यज्ञस्थानी येऊन बळीकडे दान मागितले. इतक्या तेजस्वी बटूला पाहून शुक्राचार्यांना तोच विष्णू असल्याचा संशय आला. त्यांनी तसे बळीला बोलून दाखवले. मात्र बळीने शुक्राचार्यांना सांगितले की, “प्रत्यक्ष भगवान विष्णू माझ्या द्वारी याचक म्हणून आले हाच माझा मोठा सन्मान आहे. मी त्यांना नकार देणार नाही.” वामनाने तीन पदे भूमी मागितली. जिचे दान बळीने देऊ नये म्हणून ब्राम्हण शुक्राचार्य बळीने उदक सोडण्यासाठी घेतलेल्या झारीत जाऊन बसले. वामनाने झारीच्या तोटीमध्ये दर्भ घालून शुक्राचार्यांना तेथून बाजूला केले आणि आपल्या हातावर उदक घेऊन बळीला आपले वाचन पाळण्यास सांगितले. म्हणजेच पुन्हा एकदा एक ब्राम्हण ऋषी बळीचे कथित अध:पतन टाळण्यासाठी झटला. मग आता कथित बहुजन नेते शुक्राचार्यांची पूजा करणार का? गंमत म्हणजे समस्त पृथ्वीचा सम्राट इतका सहजपणे एका ब्राम्हण बटूच्या कपटाला भूलेल, इतका भोळा असू शकेल का? किंबहुना त्याला समोर कोण आहे याची जाणीव होती, हे आपण सोयीस्करपणे कसे विसरू शकतो? आणखी एक बाब म्हणजे हा सगळा प्रसंग सुरू असताना यज्ञमंडपात केवळ वामन, शुक्राचार्य आणि बळी एवढेच नसणार. इतर राजे, सरदार आणि अन्य मंडळी तिकडे असलीच पाहिजेत. त्यांनी बळीला आपल्या संकल्पापासून परावृत्त का केले नाही? की सगळे क्षत्रिय आणि बहुजन मिळून वामनाला सामील झाले आणि त्यांनी बळीसारख्या महान राजाचा काटा काढला, असे मानायचे?
पुढे वामनाने भव्य रूप धारण करून पहिल्या पावलाने समस्त पृथ्वी, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि इतर लोक पादाक्रांत केले. बळीचे राज्य इतके प्रचंड असताना वामनाने निमिषार्धात हे कसे काय केले? एकतर ही खरोखरच आपल्या बुद्धीला न उमजलेली दिव्य लीला असावी किंवा बळीच्या राज्यातले त्याचे उर्वरित विरोधक वामनाला मदत करीत असावेत. एवढे होऊन मग वामन बळीला जिवंत का सोडतो? पाताळाचे राज्य कसे देतो? तत्कालीन प्रथेप्रमाणे अशा व्यक्तीला त्याने ठार मारणे भविष्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक नव्हते काय? विशेषत: सर्व परिस्थिती अनुकूल असताना वामनाने तसेच करणे अपेक्षित होते. आधुनिक भाषेत सांगायचे तर क्रांतीला कारण ठरू शकणाऱ्या नेत्याचा शक्य तितक्या लवकर काटा काढला जातो.
आमचे बहुजनवादी नेते नेमके हेच तर सांगू पाहतात. वामनाने बळीला राज्य वगैरे काहीही दिले नाही. त्याला कपट करून मारले. पण संपूर्ण आख्यानात तसा संदर्भ डोकावत नाही. उलट वामनाने बळीच्या औदार्यावर खूष होऊन देवांचा विरोध असताना देखील त्याला पाताळाचे राज्य दिल्याची नोंद मूळ कथेत आहे. पुन्हा सप्तपाताळांचे राज्य हे स्वर्गापेक्षाही ऐश्वर्यसंपन्न असल्याची नोंद अनेक पुराणे आणि भागवतासारख्या ग्रंथात अतिशय ठळकपणे आहे. इतकेच नव्हे तर वामनाने बळीला स्वत:हून दिलेल्या वरदानानुसार यापुढील इंद्रपद बळीलाच त्याच्या पुण्यप्रभावामुळे व न्यायप्रियतेमुळे दिले. या वचनाची पूर्तता होईपर्यंत वामनाने बळीच्या द्वारी थांबावे, असाही करार झाला. विरोधक म्हणतील कशावरून हे वरदान बळीने मागितले असेल? बळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशावरून वामनानेच हे कारस्थान रचले नसेल? याच्या अगदी उलट तर्काने विचार केला तर कशावरून बळीने वामनाकडून स्वत:ला देवांपासून सुरक्षित केले नसेल? द्वारपाल हा रक्षक असतो. नेमक्या त्याच पदी वामनाची नियुक्ती कशी? प्रधान, कुलगुरू, सेनापती किंवा तत्सम पदांवर वामन आपली वर्णी लावू शकला नसता काय? बळीचा काटा काढण्यासाठी ही पदे जास्त उपयोगी ठरली असती. थोडक्यात आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. शिवाय वामनाने मारलेल्या असुराला ब्राम्हणांनी चिरंजीवपद कसे द्यावे? तो युगानुयुगे जिवंत आहे, हे कसे मानावे?
रामायणाच्या काही कथांत याचे तुटक संदर्भ मिळतात. जेव्हा राम-रावण युद्धात रावणाची प्रचंड हानी झाली, इंद्रजीत या त्याच्या बलशाली मुलाचा पाडाव झाला, तेव्हा आता मदत कोणाकडे मागायची याचा विचार रावण करू लागला. अहंकारी स्वभावाच्या रावणाने आपल्यापेक्षा कनिष्ठ राजांकडे मदत मागण्याच्या पर्यायाचा विचार न करता असुरकुळातील सर्वात महान सम्राट बळीची मदत मागायचे ठरविले. तसा तो पाताळनगरीत पोहोचला देखील. बळीच्या महालाच्या द्वारावर उभा असलेल्या वामनाने रावणाला रोखून बळीला भेटण्याचे कारण विचारले. रावणाला विष्णूशी याविषयी बोलायचे नसल्यामुळे त्याने सूक्ष्म रूप धारण करून वामनाला चकवायचा प्रयत्न केला. मात्र वामनाने रावणाच्या शरीरावर सहज आपला पायाचा अंगठा ठेवून त्याला अक्षरश: जेरीस आणला. पुढे त्यातून सुटका झाल्यावर रावण बळीसमोर आला. त्यावेळी बळी आपल्या दरबारात एकटाच बसून काही विचार करीत होता. रावणाला अचानक कोणत्याही वर्दीशिवाय आत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वामनाने तुला आत कसे सोडले, असे बळीने रावणाला विचारले. त्यावर रावणाने फुशारकी मारून मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हटल्यावर बळीने वामन हा प्रत्यक्ष भगवान विष्णू असून, त्याचा कृपेशिवाय तू जिवंत देखील राहू शकणार नाहीस, असे सुनावले. पुढे रावणाने रामाशी सुरू असलेल्या युद्धाची माहिती सांगून बळीकडे मदत मागितली. त्यावर काहीवेळ समाधी लावून बळीने युद्धाचे खरे कारण जाणून घेतले व रावणाला सल्ला दिला की त्याने सीतेला तिच्या स्वगृही पाठवल्यास हे युद्धच संपुष्टात येईल. तसेच परस्रीचे हरण करणे असुर कुळाला शोभणारे नसून राम न्यायबुद्धीचा असल्याचे बळीने रावणाला समजावले. मात्र रावणाला ते पटले नाही, तो बळीची मदत न मिळवताच लंकेला परतला.
तेजपूर (आसाम) येथे उभारलेला हरि-हर युद्धाचा देखावा |
पुढे महाभारतात (वस्तुत: भागवत ग्रंथात) अनिरुद्ध आणि उषेच्या विवाहाचे आख्यान आहे. अनिरुद्ध हा श्रीकृष्णाचा रुख्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्न या मुलाचा पुत्र म्हणजे नातू होता. तर बाणासुर हा बळीच्या १०० पुत्रांपैकी सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा संपादित केली होती. त्यातून त्याला सहस्र बाहू आणि अपार शक्ती प्राप्त झाली होती. भगवान शंकराचा तो जणू मानसपुत्र होता. त्याची कन्या उषेने अनिरुद्धला तिच्या स्वप्नात पाहिले आणि तिने तिच्या चित्रकला या सखीकरवी अनिरुद्धला आपल्या शोणितपूर नगरीत (हे नगर आणि मंदिर अद्याप आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात पाहता येते.) आणवले. पुढे अनिरुद्ध आणि उषा यांनी गंधर्वविवाह करून त्याची वार्ता बाणासुराला दिली. ज्यामुळे खवळलेल्या बाणासुराने युद्धात अनिरुद्धाचा पराभव करून त्याला नाग्पाशात बद्ध करून ठेवले. ही बातमी नारदाकरवी कृष्ण-बलराम आणि इतर यादवांना कळताच त्यांनी शोणितपूर गाठून बाणासुराला आव्हान दिले. पुढे झालेल्या घनघोर युद्धात बाणासुराचे अतोनात नुकसान झाले. त्याचे एक सहस्र बाहू देखील कृष्णाने तोडून टाकले, पण त्याचा वध केला नाही. अखेरीस बाणासुराने कळवळून केलेल्या धाव्यामुळे स्वत: महादेव कृष्णाविरुद्ध युद्धास सज्ज झाले. तेव्हा ब्रह्मदेवांनी हस्तक्षेप करून हरि-हरांमध्ये होऊ घातलेले युद्ध टाळले. कृष्णाने शंकराला आठवण करून दिली की मी प्रल्हादाच्या वंशातील व बळीच्या पुत्रांस मारणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच तुम्हीच बाणासुराला त्याचे गर्वहरण होईल, असा शाप दिला होतात. त्यानुसार मी हे कार्य केले. शंकरांनी सुद्धा हे मान्य करून बाणासुरास कृष्णाच्या खऱ्या रुपाची कल्पना देऊन त्यांस शरण जाण्यास सांगितले. पुढे बाणासुराने स्वत: अनिरुद्ध आणि उषेचे थाटामाटात लग्न लावून कृष्णाशी देखील आपला आप्तसंबंध दृढ केला.
थोडक्यात विष्णू (मग तो देव असो किंवा सृष्टीकल्याण साधणाऱ्या युगपुरुषांचा वंश अथवा उपनाम) आणि असुर यांचे काहीही वाकडे नव्हते. प्रसंगी विष्णू आणि महादेव या दोन प्रमुख दैवतांनी असुरांचे रक्षणच केले आहे. समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी कदाचित वामनाने देव-बळी यांच्यातील वाद विकोपाला जाण्यापूर्वीच हस्तक्षेप केला असेल. पण कोणत्याही पौराणिक कथांमधून बळीची दुष्ट प्रतिमा रंगवली गेली नाही अगर हे सत्य लपवले गेले नाही. किंबहुना आधुनिक अभ्यासक तर आत्ताचे तिबेट (त्रिविष्टप) हा स्वर्ग असावा, भरतखंड (इराणच्या पूर्वेपासून ते आत्ताच्या इंडोनेशियापर्यंत प्राचीन अखंड भारत) हे पृथ्वी आणि आत्ताचे दक्षिण अमेरिका हे पाताळ असावे, असा सिद्धांत मांडला आहे. महान असुर संस्कृती, त्यांची सभ्यता, भव्य वास्तू, शिव, विष्णू आणि गणपती या दैवतांची मंदिरे, हत्ती व सिंहासारख्या केवळ भारत व आफ्रिकेत आढळणाऱ्या प्राण्यांचे या ठिकाणी असलेले महत्व, प्राचीन मुद्रांवर अंकित असलेल्या बळी, वामन, बुद्ध आणि कृष्णाच्या प्रतिमा व तेलुगू भाषेशी साधर्म्य असलेली लिपी आणि उच्चार हे दक्षिण अमेरिकेतील आदिवासी समाजात आजही अनुभवता येते. हिरण्यकश्यपूची राजधानी ही सध्याच्या आंध्र प्रदेशात होती, असेही अभ्यासक मानतात, हे येथे नमूद केले पाहिजे. मयन व इंका या दक्षिण आफ्रिकेतील प्राचीन संस्कृती मयासुर आणि इतर भारतीय पात्रांशीच नाते सांगणारे असल्याचे आता सिद्ध झाले आहे. थोडक्यात पौराणिक इतिहास युरोपियन शैलीप्रमाणे एकसंध आणि मुद्देसूद नसला तरी असत्य किंवा प्रक्षिप्त नाही. जर त्याचा नीट अभ्यास केला तर आजच्या बहुतेक धारणा आपल्याला गुंडाळून ठेवाव्या लागतील. बहुजन आणि सवर्ण हा आत्ताच्या काळात नामशेष होऊ पाहणारा संघर्ष पुन्हा पेटवण्यासाठी काही समाजद्रोही बळीराजा आणि तत्सम महान विभूतींना देखील बदनाम करू पाहात आहेत. द्रविड अस्मितेच्या भोंगळ संकल्पनेने आज दक्षिण भारतात उभी केलेली सामाजिक आणि राजकीय दरी देशाला कोठे घेऊन जाणार हे आपण बघतोच आहोत. तेव्हा फुले-आंबेडकरांच्या चिकित्सक महाराष्ट्राने तरी कोणाच्या मागे जायचे हे ठरवायची वेळ आली आहे.
आता प्रश्न उरतो की, हा शेतकरी समाजाला आपलासा वाटणारा बळीराजा कोण असावा? त्याचेही उत्तर आपल्या प्राचीन इतिहासात दडलेले आहे. शेष नागाचा द्वापारयुगातील अवतार, संकर्षण या नावाने प्रसिद्ध तो कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता बलराम हाच खरा बळीराजा. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्याने आपल्या नांगराने यमुनेचे पाणी ओढून नेले (कालवे बांधले), जो गोपालांमध्ये लहानाचा मोठा झाला संस्कृतातील बलरामचा भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रेमाने त्याला बळीराजा म्हणायला सुरुवात केली असावी आणि पुढे हा आणि तो बळीराजा यांच्यात गल्लत झाली (किंवा केली) असावी. याउलट बळीराजाचे आहे. कोणत्याही पुराणात किंवा कथानकात बळीराजा शेती करतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमके करतो किंवा नांगर आणि अन्य आयुधे धारण करतो, असे दाखविलेले नाही. याउलट बलराम हा उग्रसेन व वसुदेवानंतर (श्रीकृष्ण आणि बलरामाचे पिता) द्वारकेचा राजा होता. यादवांचे गणराज्य होते. ते आपला राजा किंवा नेता प्रतिनिधी सभेतून निवडत असत. विशेष म्हणजे तत्कालीन संपूर्ण भारताच्या राजकारण व समाजकारणाचे केंद्र असलेला कृष्ण हा कधीच राजा झाला नाही. त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम हाच राजपदावर बसला होता. त्यामुळे बलराम हा शेतकरी व पशुपालक अशा यादव समाजाचा नेता या अर्थाने पुढे बळीराजा म्हणून मान्यता पावला असावा.
थोडक्यात वामनकालीन बळीराजा हा सुद्धा एक वैदिक राजा आणि क्षत्रिय वर्णाचा होता. असुर हे देखील अंतिमत: देवांचे सहोदरच आहेत. बळीराजा
कोणत्याही अर्थाने शेतकरी अथवा अहिंसेचा उपासक नव्हता. त्याने आपल्या सामाज्र्यविस्ताराच्या हेतूने तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले होते. ज्यासाठी त्याला अनेक युद्धे करावी लागली होतीच, शिवाय अश्व म्हणजे घोड्याचे बळी सुद्धा द्यावे लागले होते. तत्कालीन ब्राम्हण हे यज्ञकर्म आणि शिक्षण देणे ही २ कर्मे करीत असत. सगळेच पौराणिक ऋषी हे ब्राम्हण नव्हते. ब्राम्हणांच्या दृष्टीने सर्वात पवित्र मंत्र असलेल्या गायत्री सूक्ताचे उद्गाते एकेकाळी चक्रवर्ती सम्राट असलेले विश्वामित्र ऋषी होते. बळीचे पूर्वज प्रल्हाद व विरोचन हे विष्णूभक्त, हिरण्यकश्यपू हा ब्रह्मदेवाचा उपासक आणि बळीचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त होता. वामन आणि बळी हे दोघेही ब्राम्हण व उर्वरित हिंदू समाज या दोघांनाही तितकेच वंदनीय आहेत. वामनाने बळीवर अन्याय वगैरे केलेला नाही. तर त्याला स्वर्गापेक्षाही संपन्न अशा सप्तपातालांचे राज्य, चिरंजीवित्व आणि भविष्यातील इंद्रपद अशी ३ वरदाने दिली आहेत. स्वत: वामन हा बळीच्या विनंतीला मान देऊन त्याच्या द्वारी उभा असतो. अशी परमभक्त आणि महान व्यक्ती इतक्या क्षूद्र वादाचे कारण होणे हेच हिंदू समाजाचे दुर्दैव नाही काय?
No comments:
Post a Comment