सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

विलोभनीय आसाम


ईशान्य भारतात फिरायला जायचे, हे गेली दहा वर्षे ठरवत होतो. नोव्हेंबर महिन्यात अवचित योग जुळून आला आणि 12 जणांचा आमचा समूह दिवाळीनंतर लगोलग आसामकडे रवाना झाला.

जाताना एक दिवस कलकत्त्याला मुक्काम ठरवला होता. दक्षिणेश्‍वर येथे कालीमातेचे दर्शऩ घेऊन, बेलूर
रामकृष्ण मठाचे मुख्यालय असलेला बेलूर मठ 
येथील रामकृष्ण मठात गेलो. अत्यंत शांत व पवित्र वातावरणातील या मठात श्री रामकृष्ण परमहंस
, स्वामी विवेकानंद व रामकृष्णांचे इतर नामवंत शिष्य यांच्या समाध्या आहेत. गंगेच्या किनार्‍यावर असलेल्या या मठाच्या आवारात असलेली सदाहरित बाग आणि त्या आसमंतात कुंजन करणारे शेकडो जातीचे पक्षी यामुळे या परिसरातून परत जाताना एक वेगळीच अनुभूती लाभते.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरचे विमान असल्यामुळे गुवाहाटीत देखील लवकर पोहोचलो. आवरून सगळेच आदीशक्तीचे प्रख्यात पीठ असलेल्या कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो. आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. त्याची राजधानी असलेल्या गुवाहाटी (दिसपूर) जवळच असलेले कामरूप जिल्ह्यातील कामाख्या मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. कामरूप जिल्हा हा इतिहासकालापासून तंत्रपूजेसाठी ज्ञात आहे. कामाख्या देवीचे हे मंदिर म्हणजे तांत्रिक व शाक्त उपासकांचे माहेरघरच समजले जाते. या ठिकाणी उपासनेचे फल लवकर प्राप्त होते, या ख्यातीमुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक साधना करण्यासाठी याच ठिकाणी येणे पसंत करतात.

दक्षयज्ञाचे आमंत्रण नसतानाही शिवशंकराची प्रथम पत्नी सती आपल्या पित्याच्या घरी गेली. दक्षाच्या मनात मात्र शंकराविषयी राग असल्यामुळे त्याने सतीला अपमानास्पद वागणूक दिली. परिणामी अपमानित झालेल्या सतीने स्वतःला यज्ञकुंडातच झोकून देऊन जीवन संपविले. ही बातमी समजताच क्रुद्ध झालेल्या भोलेनाथाने तडक दक्षयज्ञाचे ठिकाण गाठून सृष्टीसंहार आरंभला. प्रजापती दक्षाचा वध करूनही शंकराचे दुःख कमी होईना. त्याने सतीचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करायला सुरूवात केली. परिणामी सृष्टीचा अंत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी भगवान विष्णूंनी हस्तक्षेप करून आपल्या सुदर्शन चक्राने सती देवीच्या शरिराचे 52 तुकडे केले. सतीच्या दिव्य शरिराचे तुकडे ज्या ठिकाणी पडले, त्या जागा आज शक्तीपीठे म्हणून ओळखल्या जातात. देवी इकडे चैतन्यरूपात अस्तित्वात असल्याची श्रद्धा आहे. सती देवीचे जननांग ज्या ठिकाणी पडले ते आजचे कामाख्या मंदिर होय. एका अर्थाने या ठिकाणी सृजनाची आराधना केली जाते. देवीचे जननांग या ठिकाणी असल्यामुळे देवीला मासिक धर्म येतो असेही मानले जाते. त्याचे प्रतीक म्हणून या मंदिरात येणार्‍या भक्तांना लालभडक कुंकू प्रसाद म्ङणून दिले
कामाख्या मंदिराच्या प्रांगणातील नटराजाचे शिल्प 
जाते. या मंदिराच्या आवारातच असलेले नटराजाचे भव्य शिल्प व नटराजाच्या पायांखाली सृष्टीच्या रक्षणाचा भार वाहणारे विष्णू हे अत्यंत जिवंत शिल्प पाहण्यास मिळाले. संपूर्ण मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे या मंदिराच्या भिंतींवर असलेली कोरीव शिल्पे देखील डोळ्यांचे पारणे फेडतात.

पुढे गुवाहाटी शहरातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्र नदातील उमानंद या शंकराच्या सुंदर मंदिराला भेट दिली. ब्रम्हपुत्राबद्दल ऐकून होतो, पण त्याचे पहिलेवहिले दर्शन देखील स्तिमित करणारे होते. शहरातून वाहणार्‍या या नदाचा दुसरा किनारा दुर्बिणीशिवाय पाहणे अशक्य व्हावे, इतकी प्रचंड रूंदी असलेल्या या नदातील पाणी मात्र तुलनेने संथ होते. पवित्र मानस सरोवरातून उगम पावणारा हा नद ईशान्य भारताची जीवनदायिनी आहे. तिबेटमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून अरूणाचल प्रदेशपासून हा नद भारताच्या हद्दीतून वाहतो. अरूणाचल प्रदेश, आसाम, प. बंगालचा काही भाग व पुढे बांग्लादेशाची लक्षावधी हेक्टरची जमीन सुजलाम-सुफलाम करणारा हा नद स्वभावाने मात्र काहीसा चंचल आहे. शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर तिबेटच्या पठारातील सुपीक मृदा आणि हिमालयाच्या कुशीतून येताना वाहून आणलेल्या गाळामुळे ब्रम्हपुत्र जेव्हा मैदानी प्रदेशात उतरतो तेव्हा तो सर्व गाळ साचून नदाचे प्रवाह बदलण्यास सुरूवात होते. स्वाभाविकच आजुबाजुच्या काही हेक्टर जमिनीला पोटात घेऊन हा नद सागराच्या दिशेने मार्गक्रमणा करतो. त्यामुळे या नदाच्या किनारी असलेली वस्ती, शेती, वन्यजीवन आणि नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते. अर्थात नदाने सतत वाहून आणलेल्या गाळामुळे आणि अमृततुल्य पाण्यामुळेच येथील सृष्टी बहरली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गाळ नदीच्या पात्राच्या मध्यभागी साचून काही नैसर्गिक बेटे तयार होतात. उमानंद देखील त्यापैकीच एक बेट आहे.

मुंबईकरांना बाबुलनाथाची आठवण करून देणार्‍या या बेटावर हजारो वर्षांच्या भूगर्भ हालचालीतून टेकडी उभी राहिली असावी. त्या टेकडीच्या शिखरावर असलेले सुंदर शिव मंदिर आणि अवतीभवती दिसणारा ब्रम्हपुत्र नद आपले भान हरपून टाकतो. शिवशंभू हा योगीराज आहे. त्याला निसर्ग आणि शांतीच्या सहवासात राहण्यास आवडते. उमानंद येथे या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्यामुळे भगवान भोलेनाथ येथे चैतन्यरूपाने वास्तव्य करीत असावेत.

यानंतर हाजो या गुवाहाटीपासून सुमारे 24 किमी अंतरावर असलेल्या गावाला आम्ही भेट दिली. हाजो गावात असलेले हयग्रीव मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे. हयग्रीव हे विष्णूचे अश्‍वरूप समजले जाते. ऋषींच्या विनंतीवरून त्यांच्या यज्ञाच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या विष्णूने हयासुर नावाच्या दैत्याचा संहार केला. हा दैत्य घोड्याचे रूप धारण करून यज्ञाचा संहार करीत असे. मात्र याचा वध केल्यानंतर योगेश्‍वर विष्णूच्या मनात देखील सुप्त अहंकार निर्माण झाला. आपल्यामुळेच या सृष्टीचे रक्षण होते, असा विचार त्याच्या मनात येताक्षणी त्याच्याच हातात असलेल्या धनुष्याचे तोंड त्याच्या दिशेने झाले आणि प्रत्यंचेवर चढविलेला शर स्वतः विष्णूची मान उडवून गेला. यज्ञकर्मात लीन असलेल्या ऋषींना जेव्हा ही घटना कळली, तेव्हा त्यांनी विष्णू परमनियतीने नेमून दिलेले कर्तव्य करतो, हे जाणून विष्णूशेजारीच पडलेले हयासुराचे मस्तक विष्णूच्या धडावर ठेवले. अहंकार ईश्‍वरी तत्वाचा देखील घात करतो, याची आठवण राहावी, म्हणूनच जणू विष्णूने हे मस्तक आपल्या शरीरावर धारण केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा म्हणजे आजचे हाजो गाव व तेथील हयग्रीव माधव मंदिर होय. मणीकुट टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचणे तसे दमछाक करणारेच आहे. पण टेकडीच्या पायथ्याशी असलेला रम्य तलाव आणि टेकडीच्या शिखरावर असलेले हे पुरातन मंदिर आपल्या श्रमांचे चीज करतात. हाजो गावाजवळ असलेले सालकुची नावाचे गाव आपल्या पैठण जवळील येवल्याची आठवण करून देते. स्थानिक रेशिमापासून बनणारे तलम कापड व साड्यांची ही मोठी पेठ आहे. या गावातच हातमागावर अप्रतिम कलाकुसर असलेल्या सिल्क साड्या मिळतात. गुवाहाटी शहरात बघण्यासारखे आणखी बरेच काही आहे. शंकरदेव कला केंद्र, गुवाहाटीचे प्राणीसंग्रहालय, कामदेवाचे मंदिर, भुवनेश्‍वरी मंदिर, वसिष्ठ ऋषींचा आश्रम, आसाम राज्य वस्तूसंग्रहालय इत्यादी प्रसिद्ध ठिकाणी केवळ वेळेअभावी जाता आले नाही.

पुढे जगप्रसिद्ध अशा काझीरंगा अभयारण्याला भेट देण्याचा कार्यक्रम होता. एकशिंगी गेंडा या अवाढव्य शाकाहारी प्राण्याचे काझीरंगा हे मोठे निवासस्थान आहे. ब्रम्हपुत्रच्या पाण्यावर पोसलेल्या माणसापेक्षाही उंचीच्या गवतावर जगणारे गेंडे सर्वांच्याच कुतुहलाचा विषय असतात. विशेष म्हणजे ईशान्य भारत वगळता उर्वरीत भारतात गेंडा हा प्राणी आढळत नाही. काझींरगामध्ये वाघही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण आमच्या या भटकंतीत वाघोबाची आमच्यावर खप्पामर्जी असावी. पहाटे हत्तीवर बसून जंगल भ्रमंती आणि संध्याकाळी जीप सफारी दरम्यान गेंडे, रानम्हशी, रानहत्ती, रानडुक्कर, हरणे, बारशिंगा अशा अनेक प्राण्यांनी आणि पाणगरूडासारख्या सहसा न
एकशिंगी गेंडा 

नीलकंठ पक्षी  

बारशिंगा आणि रानडुक्कर 














दिसणार्‍या कित्येक पक्ष्यांनी आम्हाला दर्शन दिले. नागांव व गोलाघाट या दोन जिल्ह्यांदरम्यान तब्बल 378 चौ.कि.मी. च्या पसार्‍यात हे मुख्य संरक्षित जंगल पसरले आहे. शिवाय 450 चौ.किमी.चा पट्टा या जंगलाचा भाग समजला जातो. एकीकडे गवताळ तर दुसरीकडे सदाहरित वृक्षांचे घनदाट असे हे वैविध्यपूर्ण जंगल आहे. 2014 साली झालेल्या प्राणीगणनेनुसार सुमारे 1800 गेंड्यांचे वास्तव्य या जंगलातील पाणथळ प्रदेशात आहे. तर सुमारे 86 वाघ आणि बिबटे, अस्वल, लांडगा, तरस व कोल्ह्यासारखे हिंस्त्र प्राणी देखील या जंगलात विपूल आहेत. सोनेरी माकड हे आता जवळपास नामशेष झालेले माकड तसेच डॉल्फिनसारखा अत्यंत हुशार जलचर देखील या जंगलातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्रच्या आश्रयाने राहतो. गरूड, घारी व गिधाडांसारखे शिकारी पक्षी तसेच खंड्या, सारस, नीळकंठासारखे देखणे पक्षी देखील या वनात आहेत. निसर्गप्रेमींसाठी तर रोज नवीन पैलू उलगडणारे हे जंगल खरोखरीच आसामचे वैभव आहे. आमचा मुक्काम येथे दोन दिवस होता. मात्र हे जंगल सोडताना सर्वांनाच हुरहुर वाटत होती.

पुढे जोरहाट जिल्ह्यातील माजुली बेटाला आम्ही भेट दिली. गोड्या पाण्यात असलेले जगातील सर्वात मोठे बेट असा याचा सार्थ लौकिक आहे. सुमारे 430 चौ.किमी. क्षेत्र असलेल्या या बेटाला ब्रम्हपुत्र आणि लोहित या दोन नद्यांच्या मधोमध स्थान मिळाले आहे. वैष्णव संप्रदायाचे हे आसाममधील सर्वात मोठे केंद्र समजले जाते. 100 टक्के प्रदुषणमुक्त ठिकाणी आणि लौकिक जगातील विकारांपासून दूर असलेल्या माणसांत कोणाला राहावयाचे असेल, तर माजुलीला पर्याय नाही. गेल्या 100 वर्षांत ब्रम्हपुत्रच्या सतत बदलत्या प्रवाहांमुळे हे बेट 1200 चौ.किमी. क्षेत्रफळावरून 430 चौ.किमी. पर्यंत घटले आहे. या बेटावर पोहोचल्यावर जणू इतिहासाच्या सुवर्णपानात दडलेल्या भारतात पोहोचल्यासारखे वाटले. या बेटावर साधारण 2 लाख नागरिक राहतात. मुख्य भूमीशी जोडणारा एकही रस्ता या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे फेरीबोटीनेच प्रवासी व आवश्यक सामानाची वाहतूक होते.

माजुलीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. शेती व मासेमारी हे येथील उदरनिर्वाहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. बर्‍याच शाळा व महाविद्यालय असल्यामुळे शिक्षणाची चांगली सोय आहे. सरकारी रूग्णालय आणि पोलिस ठाणे देखील आहे. मात्र निसर्गपूरक जीवनशैलीमुळे व नैतिक आचरणावर भर असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांना विशेष काम नसते. गेल्या 12 वर्षात एकही गंभीर गुन्हा या बेटावर घडला नसल्याचे पोलिसदेखील अभिमानाने सांगतात. उठसुठ धर्मावर टीका करणार्‍यांनी आदर्श धार्मिक आचरण कसे असते तो पाहण्यासाठी माजुलीला अवश्य भेट द्यावी. ऊयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मुलांना या बेटावर असलेल्या विविध मठांत (आश्रमात) शिक्षणासाठी ठेवले जाते. मात्र या ठिकाणी मदरशांसारखे केवळ धार्मिक शिक्षण मुळीच होत नाही. वेद-उपनिषदांच्या अभ्यासापासून ते इंजिनिअरिंग व मेडिकलसारखे उच्चशिक्षण घेण्यासाठी व त्या ज्ञानाचा उपयोग समाजबांधवांकरिता करण्याची शिकवण या आश्रमात राहणारे संन्यासी देतात. निर्गुण उपासक भागवत ग्रंथाची तर सगुण उपासक श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराची उपासना करतात. किमान गरजा असल्या तरी या मंडळींनी आपल्या प्रतिभेला पुरेसा वाव दिला आहे. कृष्णलीला सादर करण्याच्या निमित्ताने गायन, वादन, नृत्य, अभिनय यांची जोपासना फार लहानपणापासून केली जाते. शिवाय कृष्णलीलेच्या प्रभावी सादरकरणासाठी मुखवटेनिर्मिती व बांबूपासून इतर दर्जेदार उत्पादने या ठिकाणी तयार केली जातात.

मुखवटानिर्मिती केंद्राला भेट दिल्यावर लक्षात आले की, हे देखील एक गुरूकुल आहे. एक नया रूपयाही न घेता जिवंत मुखवटे बनविण्याचे कसब येथे शिकविले जाते. त्यासाठी केवळ आश्रमातील सहजीवनानुसार केली जाणारी कामे प्रत्येकाला करावी लागतात. मठच शिष्यांच्या उदरभरणाची काळजी घेतात. काही संन्यासी केवळ या कलेचे शिक्षण देण्याचे काम करतात. विदेशातील अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येऊन ही कला शिकून गेले आहेत. त्यामुळे सुप्रसिद्ध लंडन म्युझिअमपासून ते पॅरीसच्या वस्तूसंग्रहालयापर्यंत अनेक ठिकाणी या कलेने रसिकांची वाहवा मिळविली आहे. या बेटावर वर्णाश्रम व्यवस्था असली तरी जातीपातींना येथे थारा नाही. कर्मानुसार वर्ण ठरतो. भागवत व वेदांचे शिक्षण घेण्याची सर्वांना परवानगी आहे. फक्त त्यासाठी असलेल्या नियमांचे पालन प्रामाणिकपणे व्हावे लागते. काही मठांना, विशेषतः येथीलस सर्वात प्रसिद्ध उत्तर सत्राला आम्ही भेट दिली. प्रत्येक मठात तीन आचार्य प्रमुखपदी असतात. सर्वात प्रमुख आचार्य हे गुरूस्थानी असतात. या बेटावर त्यांचा शब्द संन्यासी व गृहस्थी सर्वांमध्येच अंतिम समजला जातो. यांच्याखालोखाल क्रमांक दोन व तीन असे आचार्य असतात. क्रमांक एकच्या मृत्यूनंतर दुसरा त्यांचे आणि तिसरा आचार्य दुसर्‍याचे स्थान घेतो. मात्र तिसर्‍या आचार्याचे रिक्त पद भरण्यासाठी सर्व गावातून मान्यवर मंडळींची एक समिती गठीत करून सामुहिक निर्णय घेतला जातो. या सर्व परंपरा अर्थातच शंकरदेवांनी निश्‍चित केलेली आहे. आद्य शंकराचार्यांइतकेच ईशान्य भारतात शंकरदेवांना मानले जाते.
 
माजुली येथील मुखवटा निर्मिती केंद्र 


पुढे शिवसागर या ऐतिहासिक शहरात मुक्काम होता. आहोम या आसामातील सर्वात लोकप्रिय राजवंशाचे हे माहेरघर. गौरीसागर आणि शिवसागर ही दोन जुळी गावे असावीत. एका गावात पार्वतीचे खूप प्राचीन मंदिर आहे. मात्र हे मंदिर भाविकांसाठी खुले नाही. जीर्णोद्धार होण्याची गरज वाटते. शिवसागरमध्ये मात्र शंकराचे भव्य मंदिर आहे. ते मात्र पाहण्यासारखे आहे. याशिवाय आहोम राजांचे वाडा, रंगघर या नावाने असलेले क्रीडा व मनोरंजन गृह, तलातल गृह नावाचा एक आगळा किल्ला अशा अनेक ऐतिहासिक स्थळांना या शहरात भेटी देता येतात.

यातील तलातल गृह हा किल्ला जमिनीखाली 7 मजले बांधकाम असलेला आहे. जमिनीवर केवळ एक मजला असलेल्या या किल्ल्याची निर्मिती शत्रूच्या आक्रमणापासून राजवंशाचा बचाव करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते. अनेक फसवे रस्ते व शत्रूला खिंडीत गाठण्यासाठी असलेल्या विशेष जागा याशिवाय जमिनीखाली सातव्या मजल्यापर्यंत असलेले निवास कक्ष आजही स्थापत्यविशारदांना थक्क करते. कारण जमिनीखाली इतक्या खोल असलेले बांधकाम जवळपास तीनशे वर्षे भक्कम उभे आहे. आजही आपण जमिनीखाली तिसर्‍या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. तळघरांमध्ये देखील वायूविजनची उत्कृष्ट सोय आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अंतर्गत विहिरी असल्या तरी या पाण्यामुळे बांधकामाला अजिबात धोका पोहोचलेला नाही. भारत हा मागासांचा देश अशी धारणा आपल्या आंग्लाळलेल्या बुद्धीजीवी वर्गाने करून घेतली आहे. अशा ठिकाणांना अधूूनमधून भेटी दिल्यावर आपल्या पूर्वर्जांनी आपल्याकरिता ज्ञानाचा केवढा मोठा खजिना मागे ठेवला आहे, याचा बोध होतो.

आसामधील आमचा शेवटचा टप्पा गोलाघाट शहराचा होता. आसाममधील हे सर्वात मध्यवर्ती शहर असून, शिवसागरकडून नागालँडकडे जाताना वाटेत आम्ही काही वेळासाठी या ठिकाणी थांबलो होतो. मध्यवर्ती शहर असल्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक वस्तू या ठिकाणी स्वस्तात विकत घेता येतात. याच शहरात असलेली कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राची शाळा देखील पाहिली. ईशान्येतील राज्यांमध्ये असलेला अलगाववाद कमी करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्‍या काही देशप्रेमी संघटनांपैकी विवेकानंद केंद्र एक अग्रणी संस्था आहे. युगपुरूष स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळी सरकार्यवाह राहिलेले एकनाथ रानडे यांच्या स्वप्नांतून साकार झालेली ही संघटना ईशान्य भारतात अनेक प्रकारची सेवाकार्ये राबविते. अगदी महाराष्ट्र-तामिळनाडूपासून या शाळेत शिकविण्यासाठी आलेले शिक्षक काही आकर्षक वेतनांमुळे या ठिकाणी आकर्षित झालेले नाहीत. तर एका उदात्त ध्येयाने भौतिक सुखे नाकारून ही मंडळी या शाळा चालवित आहेत. मिशनरीजच्या शाळांबद्दल कौतुकाचे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र अशी विद्यालये पाहिली की, आपल्या देशात हिंदूंनी देखील किती कष्टाने व अजिबात गाजावाजा न करता सेवाकार्ये चालविली आहेत, याचा साक्षात्कार होतो.  


आसाममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. पण वेळेअभावी अनेक ठिकाणी जाता आले नाही. महाभारतकालीन अनेक स्थळे या भागात आजही आहेत. असूर सम्राट बळीचा मुलगा व महान शिवभक्त बाण याची शोणीतपूर म्हणजे आजचे तेजपूर शहर होय. याठिकाणी आजही हरि-हर युद्धाच्या स्मृती जपल्या जातात. मानस अभयारण्य देखील काझीरंगासारखे एक सुंदर ठिकाण आहे. शिवाय आसपास अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

आसाम हे हवाई, रस्ते व लोहमार्ग या तिन्ही पद्धतीने मुख्य भारताशी जोडलेले आहे. अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड ही त्याची शेजारी राज्ये असून, भूतान व बांग्लादेश हे दोन शेजारी आसामलाच लागून आहेत. मुंबईकर या ठिकाणी विमानाने गेल्यास प्रवासाचा वेळ फिरण्यासाठी वापरता येऊ शकतो. कारण रेल्वेने गेल्यास किमान तीन दिवसांचा कालावधी गुवाहाटी येथे पोहोचण्यास लागतो. आमचा दौरा पुढे मेघालय, नागालँड व मणीपूर राज्ये असा होता. पुढील काही लेखांतून याही राज्यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

-          प्रणव भोंदे









No comments:

Post a Comment