सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, February 18, 2016

विलोभनीय आसाम


ईशान्य भारतात फिरायला जायचे, हे गेली दहा वर्षे ठरवत होतो. नोव्हेंबर महिन्यात अवचित योग जुळून आला आणि 12 जणांचा आमचा समूह दिवाळीनंतर लगोलग आसामकडे रवाना झाला.

जाताना एक दिवस कलकत्त्याला मुक्काम ठरवला होता. दक्षिणेश्‍वर येथे कालीमातेचे दर्शऩ घेऊन, बेलूर
रामकृष्ण मठाचे मुख्यालय असलेला बेलूर मठ 
येथील रामकृष्ण मठात गेलो. अत्यंत शांत व पवित्र वातावरणातील या मठात श्री रामकृष्ण परमहंस
, स्वामी विवेकानंद व रामकृष्णांचे इतर नामवंत शिष्य यांच्या समाध्या आहेत. गंगेच्या किनार्‍यावर असलेल्या या मठाच्या आवारात असलेली सदाहरित बाग आणि त्या आसमंतात कुंजन करणारे शेकडो जातीचे पक्षी यामुळे या परिसरातून परत जाताना एक वेगळीच अनुभूती लाभते.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरचे विमान असल्यामुळे गुवाहाटीत देखील लवकर पोहोचलो. आवरून सगळेच आदीशक्तीचे प्रख्यात पीठ असलेल्या कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो. आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. त्याची राजधानी असलेल्या गुवाहाटी (दिसपूर) जवळच असलेले कामरूप जिल्ह्यातील कामाख्या मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. कामरूप जिल्हा हा इतिहासकालापासून तंत्रपूजेसाठी ज्ञात आहे. कामाख्या देवीचे हे मंदिर म्हणजे तांत्रिक व शाक्त उपासकांचे माहेरघरच समजले जाते. या ठिकाणी उपासनेचे फल लवकर प्राप्त होते, या ख्यातीमुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक साधना करण्यासाठी याच ठिकाणी येणे पसंत करतात.

दक्षयज्ञाचे आमंत्रण नसतानाही शिवशंकराची प्रथम पत्नी सती आपल्या पित्याच्या घरी गेली. दक्षाच्या मनात मात्र शंकराविषयी राग असल्यामुळे त्याने सतीला अपमानास्पद वागणूक दिली. परिणामी अपमानित झालेल्या सतीने स्वतःला यज्ञकुंडातच झोकून देऊन जीवन संपविले. ही बातमी समजताच क्रुद्ध झालेल्या भोलेनाथाने तडक दक्षयज्ञाचे ठिकाण गाठून सृष्टीसंहार आरंभला. प्रजापती दक्षाचा वध करूनही शंकराचे दुःख कमी होईना. त्याने सतीचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करायला सुरूवात केली. परिणामी सृष्टीचा अंत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी भगवान विष्णूंनी हस्तक्षेप करून आपल्या सुदर्शन चक्राने सती देवीच्या शरिराचे 52 तुकडे केले. सतीच्या दिव्य शरिराचे तुकडे ज्या ठिकाणी पडले, त्या जागा आज शक्तीपीठे म्हणून ओळखल्या जातात. देवी इकडे चैतन्यरूपात अस्तित्वात असल्याची श्रद्धा आहे. सती देवीचे जननांग ज्या ठिकाणी पडले ते आजचे कामाख्या मंदिर होय. एका अर्थाने या ठिकाणी सृजनाची आराधना केली जाते. देवीचे जननांग या ठिकाणी असल्यामुळे देवीला मासिक धर्म येतो असेही मानले जाते. त्याचे प्रतीक म्हणून या मंदिरात येणार्‍या भक्तांना लालभडक कुंकू प्रसाद म्ङणून दिले
कामाख्या मंदिराच्या प्रांगणातील नटराजाचे शिल्प 
जाते. या मंदिराच्या आवारातच असलेले नटराजाचे भव्य शिल्प व नटराजाच्या पायांखाली सृष्टीच्या रक्षणाचा भार वाहणारे विष्णू हे अत्यंत जिवंत शिल्प पाहण्यास मिळाले. संपूर्ण मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे या मंदिराच्या भिंतींवर असलेली कोरीव शिल्पे देखील डोळ्यांचे पारणे फेडतात.

पुढे गुवाहाटी शहरातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्र नदातील उमानंद या शंकराच्या सुंदर मंदिराला भेट दिली. ब्रम्हपुत्राबद्दल ऐकून होतो, पण त्याचे पहिलेवहिले दर्शन देखील स्तिमित करणारे होते. शहरातून वाहणार्‍या या नदाचा दुसरा किनारा दुर्बिणीशिवाय पाहणे अशक्य व्हावे, इतकी प्रचंड रूंदी असलेल्या या नदातील पाणी मात्र तुलनेने संथ होते. पवित्र मानस सरोवरातून उगम पावणारा हा नद ईशान्य भारताची जीवनदायिनी आहे. तिबेटमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून अरूणाचल प्रदेशपासून हा नद भारताच्या हद्दीतून वाहतो. अरूणाचल प्रदेश, आसाम, प. बंगालचा काही भाग व पुढे बांग्लादेशाची लक्षावधी हेक्टरची जमीन सुजलाम-सुफलाम करणारा हा नद स्वभावाने मात्र काहीसा चंचल आहे. शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर तिबेटच्या पठारातील सुपीक मृदा आणि हिमालयाच्या कुशीतून येताना वाहून आणलेल्या गाळामुळे ब्रम्हपुत्र जेव्हा मैदानी प्रदेशात उतरतो तेव्हा तो सर्व गाळ साचून नदाचे प्रवाह बदलण्यास सुरूवात होते. स्वाभाविकच आजुबाजुच्या काही हेक्टर जमिनीला पोटात घेऊन हा नद सागराच्या दिशेने मार्गक्रमणा करतो. त्यामुळे या नदाच्या किनारी असलेली वस्ती, शेती, वन्यजीवन आणि नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते. अर्थात नदाने सतत वाहून आणलेल्या गाळामुळे आणि अमृततुल्य पाण्यामुळेच येथील सृष्टी बहरली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गाळ नदीच्या पात्राच्या मध्यभागी साचून काही नैसर्गिक बेटे तयार होतात. उमानंद देखील त्यापैकीच एक बेट आहे.

मुंबईकरांना बाबुलनाथाची आठवण करून देणार्‍या या बेटावर हजारो वर्षांच्या भूगर्भ हालचालीतून टेकडी उभी राहिली असावी. त्या टेकडीच्या शिखरावर असलेले सुंदर शिव मंदिर आणि अवतीभवती दिसणारा ब्रम्हपुत्र नद आपले भान हरपून टाकतो. शिवशंभू हा योगीराज आहे. त्याला निसर्ग आणि शांतीच्या सहवासात राहण्यास आवडते. उमानंद येथे या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्यामुळे भगवान भोलेनाथ येथे चैतन्यरूपाने वास्तव्य करीत असावेत.

यानंतर हाजो या गुवाहाटीपासून सुमारे 24 किमी अंतरावर असलेल्या गावाला आम्ही भेट दिली. हाजो गावात असलेले हयग्रीव मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे. हयग्रीव हे विष्णूचे अश्‍वरूप समजले जाते. ऋषींच्या विनंतीवरून त्यांच्या यज्ञाच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या विष्णूने हयासुर नावाच्या दैत्याचा संहार केला. हा दैत्य घोड्याचे रूप धारण करून यज्ञाचा संहार करीत असे. मात्र याचा वध केल्यानंतर योगेश्‍वर विष्णूच्या मनात देखील सुप्त अहंकार निर्माण झाला. आपल्यामुळेच या सृष्टीचे रक्षण होते, असा विचार त्याच्या मनात येताक्षणी त्याच्याच हातात असलेल्या धनुष्याचे तोंड त्याच्या दिशेने झाले आणि प्रत्यंचेवर चढविलेला शर स्वतः विष्णूची मान उडवून गेला. यज्ञकर्मात लीन असलेल्या ऋषींना जेव्हा ही घटना कळली, तेव्हा त्यांनी विष्णू परमनियतीने नेमून दिलेले कर्तव्य करतो, हे जाणून विष्णूशेजारीच पडलेले हयासुराचे मस्तक विष्णूच्या धडावर ठेवले. अहंकार ईश्‍वरी तत्वाचा देखील घात करतो, याची आठवण राहावी, म्हणूनच जणू विष्णूने हे मस्तक आपल्या शरीरावर धारण केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा म्हणजे आजचे हाजो गाव व तेथील हयग्रीव माधव मंदिर होय. मणीकुट टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचणे तसे दमछाक करणारेच आहे. पण टेकडीच्या पायथ्याशी असलेला रम्य तलाव आणि टेकडीच्या शिखरावर असलेले हे पुरातन मंदिर आपल्या श्रमांचे चीज करतात. हाजो गावाजवळ असलेले सालकुची नावाचे गाव आपल्या पैठण जवळील येवल्याची आठवण करून देते. स्थानिक रेशिमापासून बनणारे तलम कापड व साड्यांची ही मोठी पेठ आहे. या गावातच हातमागावर अप्रतिम कलाकुसर असलेल्या सिल्क साड्या मिळतात. गुवाहाटी शहरात बघण्यासारखे आणखी बरेच काही आहे. शंकरदेव कला केंद्र, गुवाहाटीचे प्राणीसंग्रहालय, कामदेवाचे मंदिर, भुवनेश्‍वरी मंदिर, वसिष्ठ ऋषींचा आश्रम, आसाम राज्य वस्तूसंग्रहालय इत्यादी प्रसिद्ध ठिकाणी केवळ वेळेअभावी जाता आले नाही.

पुढे जगप्रसिद्ध अशा काझीरंगा अभयारण्याला भेट देण्याचा कार्यक्रम होता. एकशिंगी गेंडा या अवाढव्य शाकाहारी प्राण्याचे काझीरंगा हे मोठे निवासस्थान आहे. ब्रम्हपुत्रच्या पाण्यावर पोसलेल्या माणसापेक्षाही उंचीच्या गवतावर जगणारे गेंडे सर्वांच्याच कुतुहलाचा विषय असतात. विशेष म्हणजे ईशान्य भारत वगळता उर्वरीत भारतात गेंडा हा प्राणी आढळत नाही. काझींरगामध्ये वाघही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण आमच्या या भटकंतीत वाघोबाची आमच्यावर खप्पामर्जी असावी. पहाटे हत्तीवर बसून जंगल भ्रमंती आणि संध्याकाळी जीप सफारी दरम्यान गेंडे, रानम्हशी, रानहत्ती, रानडुक्कर, हरणे, बारशिंगा अशा अनेक प्राण्यांनी आणि पाणगरूडासारख्या सहसा न
एकशिंगी गेंडा 

नीलकंठ पक्षी  

बारशिंगा आणि रानडुक्कर 














दिसणार्‍या कित्येक पक्ष्यांनी आम्हाला दर्शन दिले. नागांव व गोलाघाट या दोन जिल्ह्यांदरम्यान तब्बल 378 चौ.कि.मी. च्या पसार्‍यात हे मुख्य संरक्षित जंगल पसरले आहे. शिवाय 450 चौ.किमी.चा पट्टा या जंगलाचा भाग समजला जातो. एकीकडे गवताळ तर दुसरीकडे सदाहरित वृक्षांचे घनदाट असे हे वैविध्यपूर्ण जंगल आहे. 2014 साली झालेल्या प्राणीगणनेनुसार सुमारे 1800 गेंड्यांचे वास्तव्य या जंगलातील पाणथळ प्रदेशात आहे. तर सुमारे 86 वाघ आणि बिबटे, अस्वल, लांडगा, तरस व कोल्ह्यासारखे हिंस्त्र प्राणी देखील या जंगलात विपूल आहेत. सोनेरी माकड हे आता जवळपास नामशेष झालेले माकड तसेच डॉल्फिनसारखा अत्यंत हुशार जलचर देखील या जंगलातून वाहणार्‍या ब्रम्हपुत्रच्या आश्रयाने राहतो. गरूड, घारी व गिधाडांसारखे शिकारी पक्षी तसेच खंड्या, सारस, नीळकंठासारखे देखणे पक्षी देखील या वनात आहेत. निसर्गप्रेमींसाठी तर रोज नवीन पैलू उलगडणारे हे जंगल खरोखरीच आसामचे वैभव आहे. आमचा मुक्काम येथे दोन दिवस होता. मात्र हे जंगल सोडताना सर्वांनाच हुरहुर वाटत होती.

पुढे जोरहाट जिल्ह्यातील माजुली बेटाला आम्ही भेट दिली. गोड्या पाण्यात असलेले जगातील सर्वात मोठे बेट असा याचा सार्थ लौकिक आहे. सुमारे 430 चौ.किमी. क्षेत्र असलेल्या या बेटाला ब्रम्हपुत्र आणि लोहित या दोन नद्यांच्या मधोमध स्थान मिळाले आहे. वैष्णव संप्रदायाचे हे आसाममधील सर्वात मोठे केंद्र समजले जाते. 100 टक्के प्रदुषणमुक्त ठिकाणी आणि लौकिक जगातील विकारांपासून दूर असलेल्या माणसांत कोणाला राहावयाचे असेल, तर माजुलीला पर्याय नाही. गेल्या 100 वर्षांत ब्रम्हपुत्रच्या सतत बदलत्या प्रवाहांमुळे हे बेट 1200 चौ.किमी. क्षेत्रफळावरून 430 चौ.किमी. पर्यंत घटले आहे. या बेटावर पोहोचल्यावर जणू इतिहासाच्या सुवर्णपानात दडलेल्या भारतात पोहोचल्यासारखे वाटले. या बेटावर साधारण 2 लाख नागरिक राहतात. मुख्य भूमीशी जोडणारा एकही रस्ता या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे फेरीबोटीनेच प्रवासी व आवश्यक सामानाची वाहतूक होते.

माजुलीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. शेती व मासेमारी हे येथील उदरनिर्वाहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. बर्‍याच शाळा व महाविद्यालय असल्यामुळे शिक्षणाची चांगली सोय आहे. सरकारी रूग्णालय आणि पोलिस ठाणे देखील आहे. मात्र निसर्गपूरक जीवनशैलीमुळे व नैतिक आचरणावर भर असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांना विशेष काम नसते. गेल्या 12 वर्षात एकही गंभीर गुन्हा या बेटावर घडला नसल्याचे पोलिसदेखील अभिमानाने सांगतात. उठसुठ धर्मावर टीका करणार्‍यांनी आदर्श धार्मिक आचरण कसे असते तो पाहण्यासाठी माजुलीला अवश्य भेट द्यावी. ऊयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मुलांना या बेटावर असलेल्या विविध मठांत (आश्रमात) शिक्षणासाठी ठेवले जाते. मात्र या ठिकाणी मदरशांसारखे केवळ धार्मिक शिक्षण मुळीच होत नाही. वेद-उपनिषदांच्या अभ्यासापासून ते इंजिनिअरिंग व मेडिकलसारखे उच्चशिक्षण घेण्यासाठी व त्या ज्ञानाचा उपयोग समाजबांधवांकरिता करण्याची शिकवण या आश्रमात राहणारे संन्यासी देतात. निर्गुण उपासक भागवत ग्रंथाची तर सगुण उपासक श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराची उपासना करतात. किमान गरजा असल्या तरी या मंडळींनी आपल्या प्रतिभेला पुरेसा वाव दिला आहे. कृष्णलीला सादर करण्याच्या निमित्ताने गायन, वादन, नृत्य, अभिनय यांची जोपासना फार लहानपणापासून केली जाते. शिवाय कृष्णलीलेच्या प्रभावी सादरकरणासाठी मुखवटेनिर्मिती व बांबूपासून इतर दर्जेदार उत्पादने या ठिकाणी तयार केली जातात.

मुखवटानिर्मिती केंद्राला भेट दिल्यावर लक्षात आले की, हे देखील एक गुरूकुल आहे. एक नया रूपयाही न घेता जिवंत मुखवटे बनविण्याचे कसब येथे शिकविले जाते. त्यासाठी केवळ आश्रमातील सहजीवनानुसार केली जाणारी कामे प्रत्येकाला करावी लागतात. मठच शिष्यांच्या उदरभरणाची काळजी घेतात. काही संन्यासी केवळ या कलेचे शिक्षण देण्याचे काम करतात. विदेशातील अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येऊन ही कला शिकून गेले आहेत. त्यामुळे सुप्रसिद्ध लंडन म्युझिअमपासून ते पॅरीसच्या वस्तूसंग्रहालयापर्यंत अनेक ठिकाणी या कलेने रसिकांची वाहवा मिळविली आहे. या बेटावर वर्णाश्रम व्यवस्था असली तरी जातीपातींना येथे थारा नाही. कर्मानुसार वर्ण ठरतो. भागवत व वेदांचे शिक्षण घेण्याची सर्वांना परवानगी आहे. फक्त त्यासाठी असलेल्या नियमांचे पालन प्रामाणिकपणे व्हावे लागते. काही मठांना, विशेषतः येथीलस सर्वात प्रसिद्ध उत्तर सत्राला आम्ही भेट दिली. प्रत्येक मठात तीन आचार्य प्रमुखपदी असतात. सर्वात प्रमुख आचार्य हे गुरूस्थानी असतात. या बेटावर त्यांचा शब्द संन्यासी व गृहस्थी सर्वांमध्येच अंतिम समजला जातो. यांच्याखालोखाल क्रमांक दोन व तीन असे आचार्य असतात. क्रमांक एकच्या मृत्यूनंतर दुसरा त्यांचे आणि तिसरा आचार्य दुसर्‍याचे स्थान घेतो. मात्र तिसर्‍या आचार्याचे रिक्त पद भरण्यासाठी सर्व गावातून मान्यवर मंडळींची एक समिती गठीत करून सामुहिक निर्णय घेतला जातो. या सर्व परंपरा अर्थातच शंकरदेवांनी निश्‍चित केलेली आहे. आद्य शंकराचार्यांइतकेच ईशान्य भारतात शंकरदेवांना मानले जाते.
 
माजुली येथील मुखवटा निर्मिती केंद्र 


पुढे शिवसागर या ऐतिहासिक शहरात मुक्काम होता. आहोम या आसामातील सर्वात लोकप्रिय राजवंशाचे हे माहेरघर. गौरीसागर आणि शिवसागर ही दोन जुळी गावे असावीत. एका गावात पार्वतीचे खूप प्राचीन मंदिर आहे. मात्र हे मंदिर भाविकांसाठी खुले नाही. जीर्णोद्धार होण्याची गरज वाटते. शिवसागरमध्ये मात्र शंकराचे भव्य मंदिर आहे. ते मात्र पाहण्यासारखे आहे. याशिवाय आहोम राजांचे वाडा, रंगघर या नावाने असलेले क्रीडा व मनोरंजन गृह, तलातल गृह नावाचा एक आगळा किल्ला अशा अनेक ऐतिहासिक स्थळांना या शहरात भेटी देता येतात.

यातील तलातल गृह हा किल्ला जमिनीखाली 7 मजले बांधकाम असलेला आहे. जमिनीवर केवळ एक मजला असलेल्या या किल्ल्याची निर्मिती शत्रूच्या आक्रमणापासून राजवंशाचा बचाव करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते. अनेक फसवे रस्ते व शत्रूला खिंडीत गाठण्यासाठी असलेल्या विशेष जागा याशिवाय जमिनीखाली सातव्या मजल्यापर्यंत असलेले निवास कक्ष आजही स्थापत्यविशारदांना थक्क करते. कारण जमिनीखाली इतक्या खोल असलेले बांधकाम जवळपास तीनशे वर्षे भक्कम उभे आहे. आजही आपण जमिनीखाली तिसर्‍या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. तळघरांमध्ये देखील वायूविजनची उत्कृष्ट सोय आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अंतर्गत विहिरी असल्या तरी या पाण्यामुळे बांधकामाला अजिबात धोका पोहोचलेला नाही. भारत हा मागासांचा देश अशी धारणा आपल्या आंग्लाळलेल्या बुद्धीजीवी वर्गाने करून घेतली आहे. अशा ठिकाणांना अधूूनमधून भेटी दिल्यावर आपल्या पूर्वर्जांनी आपल्याकरिता ज्ञानाचा केवढा मोठा खजिना मागे ठेवला आहे, याचा बोध होतो.

आसामधील आमचा शेवटचा टप्पा गोलाघाट शहराचा होता. आसाममधील हे सर्वात मध्यवर्ती शहर असून, शिवसागरकडून नागालँडकडे जाताना वाटेत आम्ही काही वेळासाठी या ठिकाणी थांबलो होतो. मध्यवर्ती शहर असल्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक वस्तू या ठिकाणी स्वस्तात विकत घेता येतात. याच शहरात असलेली कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राची शाळा देखील पाहिली. ईशान्येतील राज्यांमध्ये असलेला अलगाववाद कमी करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्‍या काही देशप्रेमी संघटनांपैकी विवेकानंद केंद्र एक अग्रणी संस्था आहे. युगपुरूष स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळी सरकार्यवाह राहिलेले एकनाथ रानडे यांच्या स्वप्नांतून साकार झालेली ही संघटना ईशान्य भारतात अनेक प्रकारची सेवाकार्ये राबविते. अगदी महाराष्ट्र-तामिळनाडूपासून या शाळेत शिकविण्यासाठी आलेले शिक्षक काही आकर्षक वेतनांमुळे या ठिकाणी आकर्षित झालेले नाहीत. तर एका उदात्त ध्येयाने भौतिक सुखे नाकारून ही मंडळी या शाळा चालवित आहेत. मिशनरीजच्या शाळांबद्दल कौतुकाचे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र अशी विद्यालये पाहिली की, आपल्या देशात हिंदूंनी देखील किती कष्टाने व अजिबात गाजावाजा न करता सेवाकार्ये चालविली आहेत, याचा साक्षात्कार होतो.  


आसाममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. पण वेळेअभावी अनेक ठिकाणी जाता आले नाही. महाभारतकालीन अनेक स्थळे या भागात आजही आहेत. असूर सम्राट बळीचा मुलगा व महान शिवभक्त बाण याची शोणीतपूर म्हणजे आजचे तेजपूर शहर होय. याठिकाणी आजही हरि-हर युद्धाच्या स्मृती जपल्या जातात. मानस अभयारण्य देखील काझीरंगासारखे एक सुंदर ठिकाण आहे. शिवाय आसपास अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

आसाम हे हवाई, रस्ते व लोहमार्ग या तिन्ही पद्धतीने मुख्य भारताशी जोडलेले आहे. अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड ही त्याची शेजारी राज्ये असून, भूतान व बांग्लादेश हे दोन शेजारी आसामलाच लागून आहेत. मुंबईकर या ठिकाणी विमानाने गेल्यास प्रवासाचा वेळ फिरण्यासाठी वापरता येऊ शकतो. कारण रेल्वेने गेल्यास किमान तीन दिवसांचा कालावधी गुवाहाटी येथे पोहोचण्यास लागतो. आमचा दौरा पुढे मेघालय, नागालँड व मणीपूर राज्ये असा होता. पुढील काही लेखांतून याही राज्यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

-          प्रणव भोंदे









प्रिय सुजीत, आम्हाला क्षमा कर !!

उमद्या वयात तुला या जगाचा हकनाक निरोप घ्यावा लागला. आज तुझी हत्या झाली आणि त्या बातमीसोबत आलेला तुझा हसरा फोटो अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवून गेला.

तू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असणे, हीच तुझी चूक होती. आपल्या या भारतमातेसाठी जगण्याची, तिच्या उत्कर्षासाठी काही करण्याची स्वप्ने बाळगण्याचा गंभीर गुन्हा तुझ्या हातून घडला. परिणामी तुला अकाली मृत्यू पत्करावा लागला !!

अर्थात तुझ्या हत्येच्या निषेधार्थ कोणताही साहित्यिक पुरस्कार वापसी करणार नाही. कारण तू 'अखलाक' नाहीस. कोणत्याही अभिनेत्याची पत्नी त्याला देश सोडून जायचे सुचवणार नाही. कारण तुझ्या हत्येत अनैसर्गिक आणि भीती वाटावी, असे काहीच नाही. देशभर हिंसक मोर्चे निघणार नाहीत. कारण तू तथाकथित दलित नाहीस.

अरविंद केजरीवाल व राहुल गांधी तुझ्या कुटुंबाची भेट घेणार नाहीत किंवा सोनिया तुझ्या आईला सांत्वनाचे पत्रही पाठवणार नाहीत. कारण तुझ्यामुळे कोणतीही व्होटबँक त्यांना लाभणार नाही. तुझ्या नावाने कोणत्याही रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार नाहीत. कारण तू 'इशरत जहां' नाहीस. जे.एन.यू. मधील विद्यार्थी आणि शिक्षक तुझ्यासाठी संप पुकारणार नाहीत. कारण तू संसदेवर हल्ला करणारा 'अफझल गुरू' किंवा शेकडो निरपराध नागरिकांची हत्या करणारा 'याकुब मेमन' नाहीस.

पण एक नक्की की, तुझे हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. तू ज्या भारतमातेसाठी हे मरण पत्करलेस, तिच्या उत्कर्षासाठी आम्ही तन-मन-धन पूर्वक कार्यरत राहू.

Sad NEWS
A 27-year-old RSS worker was hacked to death in front of his aged parents at Papinesseri in Kannur district, police said. Sujit, who suffered serious injuries in the attack, succumbed to injuries before reaching hospital last night.


- प्रणव भोंदे


अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. खरेतर टिकेकर हे पत्रकार म्हणून आमच्या पिढीचे आजोबाच ठरतील. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचे वगैरे प्रसंग आम्ही नक्कीच सांगू शकणार नाही. पण गेल्या ५ वर्षांत अवचितपणे त्यांना भेटण्याच्या, काही वेळ त्यांच्या सहवासात राहण्याच्या संधी नक्कीच मिळाल्या होत्या.

पुण्यातील 'प्रबोधन मंच' नावाच्या संस्थेने प्रसारमाध्यम विषयावर एक परिषद आयोजित केली होती. संस्थेचे प्रमुख हरिभाऊ मिरासदार आणि त्यांचे सहकारी व हिंदुस्थान समाचारचे तत्कालीन ब्यूरो चीफ अरुण करमरकर असे दोघे जण टिकेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बांद्र्याच्या घरी जाणार होते. अरूणजींनी मला सोबत येतोस का विचारले. मी आनंदाने त्यांच्यासोबत टिकेकरांच्या घरी गेलो. आम्ही पोचलो तेव्हा त्यांचे अभ्यासिकेत काहीतरी काम सुरू असावे. थोड्याच वेळात ते बाहेर आले. प्रत्येकाची ओळख करून काहीना काही मिश्कील टिपण्णी केली. हरिभाऊंचे बंधू म्हणजे प्रख्यात विनोदी लेखक द.मा.मिरासदार. त्यामुळे पुढचा काही वेळ द.मा.यांच्या आठवणी जागवण्यात गेल्या. पुढे हरिभाऊ यांनी 'प्रबोधन मंच' आयोजित परिषदेची माहिती सांगितली. टिकेकरांनी त्यातील प्रत्येक विषय व इतर वक्त्यांची माहिती घेऊन, त्या प्रत्येक विषयावर काही सूचना केल्या. अर्थातच त्यांनी त्या परिषदेत बीजभाषण करण्याचे आमंत्रण स्वीकारले.

पुढे त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. अर्थात गाडी त्यांची, चालकही त्यांच्यासोबत होताच आणि माझ्यापेक्षाही पुण्याची माहिती त्यांनाच अधिक होती. थोडक्यात मी त्यांना नव्हे तर ते मला घेऊन पुण्याला जाणार होते. आदल्या दिवशी त्यांना फोन करून घाबरतच विचारले की, माझ्यासोबत आणखी एक तरूण पत्रकार (संकेत सातोपे) पुण्याला येणार आहे. तो आपल्यासोबत आला तर चालेल ना? "आमच्या गाडीत मावणारा असेल तर काहीच हरकत नाही," असा मिश्कील होकार समोरून मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी पोहोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.

प्रवासाची आठवण म्हणजे टिकेकर यांचे अखंड धुम्रपान (त्यामुळे आमची झालेली घुसमट), बालभारतीमधील निवडक कवितांची त्यांनी बनवून घेतलेली सीडी सोबतीला होतीच. प्रत्येक कविता ऐकल्यानंतर आमची परीक्षा व्हायची. ही कविता कोणाची? कितवीच्या पुस्तकात होती? इत्यादी प्रश्न विचारून त्याची उत्तरे सुद्धा तेच देत होते. सोबत कवितेचे सार्थ रसग्रहण सुरू होतेच. दरम्यान लोणावळ्याजवळ फूड मॉलमध्ये विश्रांती थांबा झाला. त्यांनी फक्त चहाच घेतला तरी आम्हाला मात्र पोटभर नाश्ता करायला लावले. परिषदेच्या आयोजकांनी अशा वरखर्चासाठी दिलेले पैसे काढल्यावर आम्हाला चांगलाच ओरडा पडला. पुढचा प्रवास पत्रकारिता विषयक धड्यांचा होता. त्यात टिकेकरांच्या विविध आठवणी, काही मोठ्या राजकीय नेत्यांबाबतचे प्रसंग, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेली संपादकीय जुगलबंदी इत्यादी अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

संपादक म्हणजे वातानुकुलीत खोलीत बसून आपल्याला वाटेल ते लिहिणारा व्यक्ती नव्हे, तर अत्यंत अभ्यासू, समाजातील प्रत्येक सूक्ष्म प्रवाहांची बित्तंबातमी असलेला आणि त्याविषयी तटस्थ मत असलेला मान्यवर असतो, हे ऐकले होते. टिकेकरांच्या रूपाने असा साक्षेपी संपादक प्रथमच पाहात होतो. एका विद्वान व्यक्तीबरोबर प्रवास करण्याची, सलग ३-४ तास सोबत राहण्याची आमची पहिली वेळ होती. स्वाभाविकच आमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण त्यांना जाणवला असावा. ज्या सहजतेने, एका मित्राप्रमाणे त्यांनी आमच्याशी संवाद साधला तो खरोखरीच संस्मरणीय होता.

पुढील काळातही २-३ प्रसंगांत टिकेकरांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक भेटीची स्वतंत्र आठवण आहे. अशा व्यक्ती होणे नाही हेच खरे. मन:पूर्वक श्रद्धांजली.


- प्रणव भोंदे

रोहित वेमुलाची शोकांतिका


रोहित वेमूला या विद्यार्थ्याची आत्महत्या सध्या ब्रेकिंग न्यूज झाली आहे. गेल्या दीड वर्षांत आपला देश अचानक 'असहिष्णू' होऊ लागला आहे म्हणे !! त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजपचे नेते ज्या प्रकरणात संशयित आहेत, ते प्रकरण विरोधकांना व प्रसारमाध्यमांना सापडले म्हणजे बघायलाच नको. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी नामक वाचाळांनी ही संधी कशी सोडावी? पण...
या आत्महत्येमुळे काही प्रश्न अनुत्तरीत राहू नयेत.

१. रोहित आणि त्याच्या ज्या सहकारी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले ते कारण नेमके काय होते? त्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती हे खरे आहे का? जर असेल तर मग निलंबन चुकीचे कसे ठरू शकते?

२. रोहितवर जी कारवाई झाली ती दलित म्हणून की विद्यार्थ्यांकडून अपेक्षित अनुशासनाचा भंग झाला म्हणून?

३. तब्बल १२ दिवस रोहित उघड्यावर झोपत होता. डिप्रेशनमध्ये गेला होता, असे त्याचे मित्र आणि आंबेडकर स्टुडंट्स युनियनचे पदाधिकारी म्हणतात. मग एवढे दिवस त्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची आणि तातडीने मानसोपचार सुरू करण्याची गरज नव्हती काय? यात हलगर्जी दाखविल्याबद्दल आणि रोहितच्या मृत्यूचे भांडवल केल्याबद्दल या संघटनेवर सुद्धा कारवाई का होऊ नये? की रोहितचा वापर गिनिपिग म्हणून करायचे ठरले होते?

४. आजच आणखी एक बातमी आली आहे. गेल्या १० वर्षांत याच विद्यापीठात तब्बल ९ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या काळात केंद्रात आणि राज्यांत राहुल गांधी यांच्याच पक्षाची सत्ता नव्हती काय? त्यातही काही काळ स्वत: राहुल गांधी हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मग या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांनी काय केले हे आधी सांगावे. अन्यथा त्यांना या आत्महत्येचे राजकीय भांडवल करण्याचा अधिकारच नाही.

५. असहिष्णुता ही नेहमीच निवडणूक काळात कशी बोकाळते? केरळ आणि बंगालची निवडणूक तोंडावर असताना दलित मतपेढ्या सुरक्षित करण्यासाठी तर हा सगळा खटाटोप नव्हे ना?


- प्रणव भोंदे

सेल्फी, सेल्फिश आणि सेल्फलेस कार्य


रमेश वाळुंज हा बांद्रा किल्ल्याजवळ एका कच्च्या घरात राहणारा आपल्यासारख्याच एक तरूण होता. वाहनचालकाचे काम करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात तो आपली पत्नी आणि तीन मुलांचे उदरभरण करीत असे. शिवाय गावाला राहणाऱ्या आपल्या आईला सुद्धा तो दरमहा पैसे पाठवत होता. बँडस्टँड येथील किल्ला किंवा समुद्रातील खडकांवर उभे राहून अनेक तरूण-तरूणी स्वतःची छायाचित्रे आणि सेल्फी काढण्यात दंग असतात आणि मग तोल जाऊन किंवा मोठ्या लाटेच्या तडाख्याने ते पाण्यात पडतात. अशा सुमारे 30 जणांचे प्राण या रमेश वाळुंजने आत्तापर्यंत वाचवले होते. परवा तीन युवती किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाच्या टोकावर उभ्या राहून सेल्फी काढताना 70 फूट उंचीवरून समुद्रात कोसळल्या आणि गटांगळ्या खाऊ लागल्या. हे पाहिल्यावर रमेशने भरतीची वेळ असल्यामुळे उधाण आलेल्या समुद्रात उडी घेऊन त्यातील 2 मुलींचे प्राण वाचवले. पण तिसरीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात रमेशवरच काळाची कुऱ्हाड कोसळली. 

रमेशचा हा अपमृत्यू मनाला चटका लावणारा आहे. त्याला मी ओळखत नव्हतो. आजच्या दै. लोकसत्तामधील 'आशुतोष सावे' यांच्या पत्रातून ही सगळी माहिती समजली. रमेशच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. आपण केवळ त्याची कल्पनाच करू शकतो. एकीकडे हजारो रूपयांचे मोबाईल विकत घेऊन कवडीमोलाच्या सेल्फी काढण्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणारे युवक, दुसरीकडे असे युवक आपला जीव धोक्यात घालतात याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे आपल्यासारखे सेल्फिश आणि रमेश वाळुंजसारखे स्वतःच्या जीवावर उदार झालेले दीपस्तंभ आपल्यासमोर असतात.

आज राष्ट्रीय युवा दिन आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती आपण 'युवक दिवस' म्हणून साजरी करतो. दिवस / सण / उत्सव आपण वेळोवेळी साजरे करतो, मात्र त्याचे औचित्य कधीच लक्षात घेत नाही. निदान आज तरी वरीलपैकी कोणता पर्याय निवडायचा, हे ठरवून तसा संकल्प करूया !! रमेश वाळुंज यांना मन:पूर्वक श्रद्धांजली !!


- प्रणव भोंदे

निलाजरे काँग्रेसजन !!

केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसच्या भाटांना अतिशय अस्वस्थ वाटत असल्याचे सोशल मीडियावर दिसते आहे. त्यांच्यामते हिंदू धर्मातील 'असहिष्णू'तेला कंटाळूनच आंबेडकरांनी धर्मांतर केले. त्यामुळे भाजपवाल्यांना आंबेडकरांचे नाव वापरायचा अधिकार नसल्याचे काँग्रेसभाटांचे म्हणणे आहे. त्यांच्याकरिता काही प्रश्न....

१. आंबेडकरांना हिंदू धर्मातील कुप्रथांबद्दल राग होता हे मान्य. पण इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल आंबेडकरांना काय वाटत होते?

२. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी दाखवलेली आमिषे फेटाळून डॉ. आंबेडकरांनी भारतीय मातीत जन्मलेला बौद्ध धर्मच का स्वीकारला?

३. गेल्या ६० वर्षांचा इतिहास पाहताना धर्मांतरणामुळे दलित समाजाला त्यांचा आत्मसन्मान खरोखरच मिळाला का?

४. विशेषतः खैरलांजीसारख्या घटना घडल्यावर काँग्रेसच्या तत्कालीन राज्य आणि केंद्रिय नेतृत्वाने सामाजिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नेमकी काय पावले उचलली?

५. समान नागरी कायद्याबद्दलची डॉ. आंबेडकर यांची मते काँग्रेसला मान्य आहेत का? या संदर्भातील एखादे विधेयक सत्ताधाऱ्यांनी संसदेत आणले तर काँग्रेस त्याला बिनशर्त समर्थन देणार का?

६. डॉ. आंबेडकरांनी आरक्षण धोरणाच्या कालमर्यादेची गरज व्यक्त केली होती. या विषयावर निकोप चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी आहे का?

७. असहिष्णुतेचा सध्याचा विषय ज्या गोहत्येच्या मुद्यावरून समोर आला, त्या गोहत्येबद्दल डॉ. आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रातः स्मरणीय महात्मा गांधी यांना नेमके काय वाटायचे?

८. पुणे कराराबद्दल काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाला काय वाटते?


- प्रणव भोंदे

धरले तर चावते.... तरीही !!



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याबद्दल, चांगले अगर वाईट बोलावे, असे काहीही नाही. रशियाशी पूर्वीचे असलेले घट्ट संबंध गेल्या काही वर्षात उतरणीला लागले आहेत. तेव्हा पंतप्रधानांच्या या औपचारिक भेटीतून खूप काही साधेल, असे नाही.एखाद्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकाने अशी प्रतिक्रिया दिली असती तर इतके नवल वाटले नसते. मात्र ही विधाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील उप-विरोधीपक्षनेते आनंद शर्मा यांनी मोदी रशिया दौऱ्यावर असताना दिल्लीत झालेल्या दैनंदिन पत्रपरिषदेत केली होती. अर्थात राजकीय धक्कातंत्रात तरबेज असलेल्या मोदींनी शर्मा यांना आपल्यावर टीका करण्याची संधी पुढील दोनच दिवसात देऊ केली. रशियातून मोदी रवाना झाले ते अफगाणिस्तानची राजधानी काबूलकडे. तेथे भारताच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या अफगाणिस्तानच्या नव्या संसदभवनाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तान संसदेच्या दोन्ही सदनातील सदस्यांना एका संयुक्त सभेत संबोधित करताना भारत-अफगाणिस्तान दरम्यान असलेले मधुर संबंध काही जणांना पाहवत नसले तरी, सर्व अडचणींवर मात करून आम्ही आमचे चांगले संबंध टिकवून ठेवू, असे प्रतिपादित केले. यातील काही जणांनाहा उल्लेख अर्थातच पाकिस्तानला उद्देशून केला गेला होता.

यानंतर काही वेळातच मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केले की, काबूलहून दिल्लीला परतत असताना मी पाकिस्तानातील लाहोर येथे पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटणार आहे. पुढील २ तासात मोदी खरोखरीच लाहोरमधील शरीफ यांच्या हवेलीवर त्यांच्याशी दोस्ताना वाढवत असल्याचे संपूर्ण जगणे पाहिले. पुढील महानाट्य आणि राजकीय क्रिया-प्रतिक्रिया आपण सर्वांनीच ऐकल्या-वाचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील पठाणकोट येथे असलेल्या भारतीय हवाईदलाच्या तळावर झालेला हल्ला आणि त्याचे होणारे विश्लेषण सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. 

पठाणकोट हवाईतळ हा पाकिस्तानजवळच असलेल्या आंतराष्ट्रीय सीमेवर असल्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. १९६५ च्या भारत-पाक युद्धात सुद्धा पाक लष्कराने या तळावर हल्ले केले आहेत. मात्र गेल्या ६ महिन्यांत पंजाबात झालेला हा दुसरा अतिरेकी हल्ला असून, तो साधारण एकाच पद्धतीने झाला आहे. यापूर्वीचा हल्ला गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर झाला. त्यावेळी २४ तासांच्या आतच पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई करून हा हल्ला आटोक्यात आणला होता. पठाणकोट हल्ल्यापूर्वी
 याच दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाचे अपहरण करून त्यांना पुन्हा २४ तासांच्या आत सुखरूप सोडले होते. पाठोपाठ याच अतिरेक्यांनी पठाणकोट  हवाईतळावर हल्ला केल्याचे बोलले जाते. जवळपास ४८ तास उलटून गेल्यावर हा लेख लिहून होईपर्यंत या परिसरात धुमश्चक्री सुरूच आहे. केंद्रिय गृहमंत्री ते लष्करी अधिकारी अनेकदा पत्रकारांना सामोरे जात असून, कारवाई जवळपास संपली असून, आता कोणी दहशवादी या तळावर नाहीत ना, याची छाननी सुरू असल्याचे सांगत असतानाच नवीन चकमकीला तोंड फुटल्याचे वृत्त येऊन धडकते आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत ७ लष्करी जवान मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात असून, दहापेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. याउलट अधिकृत माहितीनुसार केवळ ४ अतिरेकीच तब्बल ४८ तासानंतर ठार झाल्याचे समजते.

गेल्या २ दिवसात अफगाणिस्तानमधील भारतीय दुतावासावर देखील २ आत्मघातकी हल्ले झाले आहेत. दोन्ही हल्ले यशस्वीपणे परतवून लावले गेले असले तरी सर्वसामान्य नागरिक देखील या एकूण घटनाक्रमामुळे अत्यंत उद्विग्न झाले आहेत. स्वाभाविकच सोशल मीडियामध्ये याचे प्रतिबिंब उमटले असून, केंद्र सरकार, विशेषत: पंतप्रधान मोदी सर्वांचे लक्ष्य ठरले आहेत. लालूप्रसाद यादव या इतरवेळी वाचाळ असलेल्या नेत्याचा अपवाद सोडला तर जवळपास सर्व विरोधी पक्ष आणि शिवसेना, अकाली दलासारखे मित्रपक्ष देखील या निमित्ताने केंद्राच्या धोरणांवर टीका करीत आहेत. मोदींनी नुकत्याच केलेल्या पाकिस्तान यात्रेचे हे फलित असण्यावर बहुतांश सामान्यजन आणि विशेषज्ञ यांचे एकमत आहे. हा किंवा असा हल्ला होणार हे पूर्वीपासून ठावूक असल्याचे व त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजल्यामुळे हल्ल्याचे मूळ लक्ष्य अतिरेकी यशस्वी करू शकले नसल्याचेही बोलले जाते. मग या घटनाक्रमाकडे आपण कसे बघायचे?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्तापर्यंत मिळालेल्या सज्जड पुराव्यांवरून हे सिद्ध होते आहे की, पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर संस्था आय.एस.आय. यांनी संयुक्तपणे हे भारतविरोधी अभियान राबविले आहे. या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट भारत आणि विशेषत: पाक सरकारला हा इशारा देणे आहे की, पाक लष्कराच्या मर्जीशिवाय तुम्हा दोन्ही देशांचे संबंध कसे असावेत, हे ठरणार नाही. अफगाणिस्तान हल्ल्यातून तर हे स्पष्टच होते की, भारत- अफगाणिस्तान एकत्र येणे हे पाक लष्कराला अजिबात मान्य होणारे नाही. थोडक्यात पाक लष्कराने जे ठरवले असेल तेच होईल. अर्थात हे सगळे अजिबात आश्चर्य वाटण्याजोगे नाही. हे यातील सर्वच घटकांना अपेक्षितच होते. मात्र यातील तीन कंगोरे आपल्या नजरेतून सुटता कामा नयेत. पठाणकोट हल्ल्याच्या दिवशीच पाक लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी २०१६ अखेरपर्यंत पाकिस्तान संपूर्ण दहशवादमुक्त झाले असेल, असे विधान केले आहे. तर याच सुमारास पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया देताना दक्षिण आशियातील दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी इतर देशांना (अप्रत्यक्षपणे भारताला देखील) आम्ही सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर भारतीय गृह, संरक्षण व विदेश मंत्रालयांनी पठाणकोट हल्ल्यासाठी थेट पाकिस्तानला (म्हणजे देश या अर्थी) जबाबदार न ठरवता पाकिस्तानी लष्कर व आय.एस.आय. चा या हल्ल्यातील सहभाग अप्रत्यक्षपणे बोलून दाखवला आहे आणि निदान आत्तापर्यंत तरी पाकिस्तानी लोकनियुक्त सरकारशी आपल्या अधिकृत चर्चा सध्या तरी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण या घटनाक्रमांत प्रत्येकाने आपापल्या भूमिका ठामपणे मांडल्या असून, भविष्यातील भारतीय उपखंडातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याची ही नांदीच आहे. भारत सरकार गेल्या वर्षभरात अनेक आघाड्यांवर आपली सामरिक भूमिका निर्णायकपणे अमलात आणत आहे. त्यात भारतीय उपखंडातील आपल्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध सुधारून त्यांना चीनच्या आहारी जावू न देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. श्रीलंका, म्यानमार, भूतान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांचा आपल्याला अद्याप तरी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असूनआपल्या कूटनीतीचे हे ठळक यश आहे. मालदीव मात्र अजूनही आपल्या नियंत्रणात नसून नेपाळशी आपले संबंध भूकंप आणि मधेशी आंदोलनामुळे पणाला लागल्याचे दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून ते संबंध पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. थोडक्यात या आघाडीवर आपली कूटनीती निदान काठावर तरी उत्तीर्ण होत आहे. पाकिस्तानबाबत मात्र यातील कोणताही निष्कर्ष घाईने काढता येणार नाही.

कारण पाकिस्तान आणि भारतात (निदान दाखविण्यापुरता ) असलेला संघर्ष काश्मीरवरून आहे आणि त्यावर निर्णायक भूमिका घेणे दोन्ही देशांना सोयीचे नाही. त्यामुळे भारतीय गोटातून पाकिस्तानविषयी बहुपदरी रणनीती ठरविण्यात आल्याचे जाणवते. त्यात एकीकडे पाकिस्तानमधील लोकशाही तत्वांशी चर्चा करून त्यांना वादग्रस्त मुद्यांशिवाय इतर समान मुद्यांवर एकत्र काम करायला लावण्यास  राजी करण्याची खटपट सुरू आहे. मोदींचा ताजा दौरा त्याच अनुषंगाने असल्याचे तज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे पाक लष्कराच्या नापाकहरकतींना वेसण घालण्यासाठी आंतराष्ट्रीय मंचावर त्यांची कोंडी करणे, भारतात गेल्या काही वर्षात पेरलेले आणि पोसलेले पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे डीप असेट्ससंपवणे आणि पाकिस्तानातील फुटीरतावादी गटांना त्यांच्याच लष्कराविरुद्ध चिथावणी देणे असा डावपेच आखल्याचे दिसत आहे. याशिवाय भारताची युद्धसज्जता वाढविणे, हेरयंत्रणा आणखी सक्षम करून अतिरेकी हल्ल्यांना पायबंद घालणे व पाक लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केल्यास त्यांना यथास्थित प्रत्युत्तर देणे ही सुद्धा गेल्या दीड वर्षातील आपल्या धोरणकर्त्यांची काही गणिते असल्याचे अभ्यासकांना जाणवते.

मग या  सर्व रणनीतीचे काही फलित दिसते आहे काय? याचे उत्तर अर्थातच होकारार्थी आहे. ताझीकीस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नुकताच झालेला तापीहा उर्जाकरार आपल्या रणनीतीकारांच्या पहिल्या धोरणाचे प्रातिनिधिक यश ठरावे. खरेतर ही योजना काँग्रेसप्रणित संपुआ सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात रेटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्या मंत्रिमंडळात अनेक पाकधार्जिणे मंत्री असूनही त्यांना असा करार करण्यासाठी पाकचे मन वळवता आले नाही, हे येथे

विशेष उल्लेखनीय ठरावे. मोदी पाकिस्तानात जाऊन आल्यावर एक अशी वदंता होती की, भारतीय पोलाद उद्योगाला अफगाणिस्तानमधील खाणींमधून काढलेले पोलाद कराची बंदरातून भारतात आणण्यास परवानगी देण्यासाठीच मोदींनी हा पाक दौरा केला. अर्थात या बातम्या मोदींना बदनाम करण्यासाठीच पेरल्या असल्या तरी याची दुसरी बाजू आर्थिक अंगानेच पाहावी लागेल. जर खरोखरीच असा करार अस्तित्वात आला तर भारतीय पोलाद उद्योगाला आणि त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेला बराच लाभ मिळू शकतो. मात्र सध्या तरी असा करार होण्याची अधिकृत बातमी नाही. थोडक्यात आर्थिक अनुनायातून दोन्ही देशांचे भले होणार असेल तर दूरदृष्टीने याचे स्वागतच केले पाहिजे. चीन आणि जापान या दोन शत्रूदेशांत सुद्धा असा व्यापार वर्षानुवर्षे व त्यांच्या संबधात कितीही तणाव असला तरी सुरू आहे, हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे.

मोदींचे परराष्ट्र दौरे हा आपल्याकडे थट्टेचा विषय असला तरी आंतराष्ट्रीय समुदाय त्यांना गंभीरपणे घेतो. मोदींनी पाकिस्तान व चीनची कोंडी करण्यासाठी आपल्या या दौऱ्यांचा यथासांग उपयोग केला असून, त्याचे दृश्यस्वरूप विवेकी व अभ्यासू लोकांच्या निदर्शनास येत आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान मिळण्यासाठी भारत विविध देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामुळे सर्वाधिक अडचण पाकिस्तान व चीनचीच होणार असल्यामुळे हे दोन्ही देश त्यांच्या अल्ला आणि माओला (देवाला या अर्थी) पाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र भारताचा हा दावा दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होताना दिसतो आहे. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला फटकारण्याची अथवा अनुल्लेखाने मारण्याची एकही संधी मोदी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सोडत नाहीत. याही बाबतीत पाक केवळ थयथयाट करतो व इतर देश त्यात हस्तक्षेप न करता हा फुकटचा तमाशा बघतात. अमेरिका, ब्रिटन, दुबई, फ्रान्स आणि जर्मनीचे लोकनिर्वाचित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि प्रमुख नेते खाजगीत व जाहीरपणे पाकिस्तानला कानपिचक्या देऊ लागले असल्याचे आश्वासक चित्र दिसते आहे. यातील दुबई व ब्रिटन दाऊदची संपत्ती गोठवत असून, अमेरिका हाफिझ सईद व हक्कानी नेटवर्कला पोखरण्याच्या मागे आहे. एकूण भारताला केवळ सहानुभूती दाखवणे, इतकीच पारंपारिक नीती या देशांनी स्वीकारली नसून, त्यांच्याकडून पाकिस्तानी लष्कराची कोंडी सुरू झाली आहे. यातूनच या देशांनी भारताला पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारशी चर्चा सुरू ठेवून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितल्याचे बोलले जाते. तसे असेल तरी ते तार्किक आणि आवश्यकच आहे. मात्र आता पाश्चात्य सांगतील तसे आम्ही झुकणार नाही. आमच्या चिंतांचा तुम्हाला कृतीरूप विचार करावा लागेल. अन्यथा तुम्ही तटस्थ राहा. आम्ही आमचे बघतो, असे संदेश भारतीय गोटातून थेटपणे जावू लागले आहेत. अर्थात पाकिस्तान-चीनची अघोरी युती व पाश्चात्य देशांचा स्वार्थी दृष्टीकोन ही आव्हाने कायम आहेत. त्यावरही उत्तरे शोधण्याची मानसिकता आता भारतीय धोरणकर्त्यांना बाळगावी लागेल.

पाकिस्ताबाबतच्या भारताच्या धोरणाचा तिसरा कंगोरा मात्र काहीसा अस्पष्ट आहे. कारण यावर कोणताही पक्ष कधीच थेटपणे बोलून त्याची जबाबदारी स्वीकारत नसतो. त्यामुळे पाक लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केल्यावर त्यांना देण्यात येणारे जोरदार प्रत्युत्तर, पाकिस्तानने आपल्याकडे घरभेद करून उभे केलेल्या हेर यंत्रणेला उध्वस्त करणे, हुर्रियत गटांना बाजूला सारून दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची झालेली त्रयस्थ ठिकाणी भेट, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन सुरू असतानाच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने पाकविरुद्ध जाहीर उठाव करून, भारताच्या समर्थनार्थ घोषणा देणे व त्याला जागतिक माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी देणे, भारतीय काश्मीरमधील अलगाववाद्यांचा आवाज दिवसेंदिवस क्षीण होणे, पाकिस्तानातील बलुचिस्तान व इतर सीमाप्रांतात तालिबानचेच काही गट पाक लष्कराच्या विरोधात जाणे, हे प्रांत पाकिस्तानातून वेगळे होणार की काय अशा वावड्या पाकिस्तानाच उठणे, पाकिस्तानातील काही राजकीय पक्षांवर ते भारताच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचे जाहीर आरोप होणे, दाऊद आणि सईदला अतिरिक्त सुरक्षा देऊन त्यांना भूमिगत करणे, पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतीय भूमीत जिवंत पकडणे व त्यांना आंतराष्ट्रीय समुदायांसमोर आणून पाकिस्ताला कोंडीत पकडणे, नेपाळशी संबध ताणले गेले असतानाही तेथून पाकिस्तानच्या एका प्रमुख हेराला अटक करणे, कट्टर भारतविरोधी म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान चक्क भारताच्या पंतप्रधानांची भेट घ्यायला दिल्लीत येणे, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अजीज यांचे अधिकार अचानक कमी होऊन त्यांना केवळ विदेश धोरणांचे सल्लागार म्हणून नियुक्त करणे, नवाझ शरीफ यांनी आपल्या मंत्र्यांना भारतविरोधी वक्तव्य न करण्याची ताकीद देणे, हे सर्व योगायोग नसतात. अर्थात याची चर्चा देखील विवेकानेच झाली पाहिजे.

वरील सर्व विश्लेषण नरेंद्र मोदींच्या पाकबाबतच्या धोरणाला शंभर टक्के योग्य ठरविण्यासाठी अजिबातच नाही. कारण सामरिक व परराष्ट्र धोरणे आखताना होणारी व्यूहरचना अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रवाही असते. दोन देशांबाबतचे नवे धोरण आखताना जुन्या धोरणाला संपूर्ण छेद कधीच देता येत नाही, भारताने इस्रायलशी संबंध जोडताना बाकी अरब राष्ट्रांशी असलेले संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घेणे जसे अभिप्रेत असते, तसेच आपल्या पूर्वसुरींनी पाकिस्तानविषयी घेतलेल्या भूमिका आणि आखलेली धोरणे संपूर्ण बदलण्याचा वेडेपणा कोणताही जबाबदार पंतप्रधान करणार नाही. मोदींनी देखील तसा तो केलेला नसला तरी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी त्यांनीच जाहीर सभा व मुलाखतींमधून केलेली वक्तव्ये त्याचे विरोधक उद्धृत करीत असतात. अर्थात हा जरी पक्षीय राजकारणाचा अविभाज्य भाग असला तरी यापुढे मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या जाहीर वक्तव्यांबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार, हे नक्की.

पठाणकोट हल्ल्यामुळेही काही गंभीर प्रश्न उद्भवले आहेत. भारतीय लष्करातील अधिकारी व जवान इतक्या सहजपणे पाकिस्तानी हेरांच्या विविध आमिषांना बळी पडणे व त्यांना संवेदनशील माहिती पुरविणे ही चिंतेची बाब आहे. तसेच ६ महिन्यांपूर्वी झालेल्या गुरुदासपूर हल्ल्याची किंवा पठाणकोट हल्ल्यापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकाच्या अपहरणाची चौकशी व तपास अर्धवट कसा काय राहिला? गुप्तचर विभागाने पूर्वसूचना देऊन आणि पुरेसा बंदोबस्त ठेवून देखील अतिरेकी चक्क लष्करी गणवेशात एका महत्वाच्या हवाई तळावर कसे घुसले? जेमतेम ४ अतिरेक्यांना कंठस्नान घालताना आपले ७ जवान (त्यातील एक तर गरूड कमांडो) धारातीर्थी पडणे सोयीचे आहे काय? देशाचे गृहमंत्री व संरक्षणमंत्री यांनी कारवाई संपल्याचे जाहीर केल्यावर तब्बल १२ तासांनी हवाईतळाच्या अंतर्गत क्षेत्रातच पुन्हा चकमकी होतात. यातून जनतेत काय संदेश गेला असावा?

इतक्या संवेदनशील ठिकाणी कारवाई सुरू असतानाही काही प्रसारमाध्यमे त्याची छायाचित्रे आणि चलत्चित्रे कशी मिळवू शकतात? पंजाबात सातत्याने असे हल्ले घडविणारे दहशवादी नेमके कोठून येतात? अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल या निमित्ताने केंद्र सरकारला करावी लागणार आहे. अशा हल्ल्यांना तोंड देताना केवळ बचावात्मक व्यूहरचना करण्यापेक्षा इतर पर्यायांची चाचपणी देखील करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वास्तवाचे भान ठेवून व गरज पडल्यास सर्व जागतिक दबाव झुगारून निर्वाणीच्या कारवाईसाठी आपल्या सुरक्षा यंत्रणा व अंतिमत: सामान्य जनतेची मानसिकता निर्माण करण्याचे अत्यंत अवघड आव्हान सरकारसमोर असणार आहे.

अरविंद केजरीवाल, राहुल गांधी असे पोपटपंची करणारे कुपमंडूक राजकीय नेते या देशात असले तरी विरोधी पक्षांमध्ये देखील अनुभवी व देशप्रेमी नेते शिल्लक आहेत. त्यांचा सल्ला व मदत घेणे हे आवश्यक असेल तर केंद्रातील नेत्यांनी नम्रपणा दाखवला पाहिजे. युद्ध हा अंतिम पर्याय नाही आणि दोन

अण्वस्त्रसज्ज देशांच्या बाबतीत तर नाहीच नाही. परंतु याशिवाय सुद्धा काही निर्वाणीचे मार्ग असू शकतात, याची जाणीव नरेंद्र मोदी, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अजित डोवल व आपल्या इतर धुरिणांना निश्चितच आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे व सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या नेत्यांनी देखील थोडी सबुरी दाखविली पाहिजे, हे देखील महत्वाचे.

गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या एका महान साधूला नदीच्या प्रवाहात एक विंचू गटांगळ्या खाताना दिसला. त्या साधूने विंचवाचा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या ओंजळीत घेतले. विंचवाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे त्यांना दंश केला व त्यामुळे तो त्यांच्या ओंजळीतून निसटला. त्या साधूने मोठ्या निर्धाराने वारंवार होणारे दंश सहन करूनही विंचवाला बुडण्यापासून वाचविले. त्या प्रख्यात साधूचे नाव श्री रामकृष्ण परमहंस असे होते. अत्यंत कठीण आव्हानांना निर्धाराने सामोरे जावून त्यातून यश मिळवतात, त्यांनाच लोक भविष्यातही लक्षात ठेवतात. श्रीरामकृष्णांच्या सत्शिष्याचा वारसा सांगणारे आपले पंतप्रधान देखील आपल्या कर्तव्याला जागून आणि कावेबाज टीकेच्या भडीमाराकडे दुर्लक्ष करून आपल्या देशाच्या सुरक्षा धोरणाची फेरआखणी करण्याची जबाबदारी नियतीने व मतदारांनी सोपविली आहे. ती यशस्वीपणे निभावून ते सामान्य जनतेला दिलासा देतील, असा विश्वास आपण बाळगू.   

-          प्रणव भोंदे